सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वीच महागाईने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. किरकोळ बाजारात साखरेच्या दराने प्रथमच किलोमागे ₹६५चा टप्पा गाठला असून, अवघ्या १५ दिवसांत साखरेच्या किमतीत तब्बल ₹१५ची वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ₹४८ ते ₹५० किलो असलेली साखर आता थेट ₹६५वर पोहोचली आहे. घाऊक बाजारातही साखरेचा दर प्रथमच ₹६०च्या पुढे गेल्याने आगामी गणेशोत्सव, रक्षाबंधन आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
साखरेच्या दरवाढीमागे उत्पादनातील घट आणि वाढलेली मागणी ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. साखर कारखान्यांनी नफा वाढवण्यासाठी उसापासून साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीला अधिक प्राधान्य दिल्याने साखरेच्या उत्पादनात सुमारे ५ टक्क्यांची घट झाली आहे. दुसरीकडे, सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे उपलब्ध साठ्यावर दबाव निर्माण झाला असून बाजारातील दर झपाट्याने वाढले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाल्याने मिठाई व्यावसायिकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.
हे ही वाचा:
दारू घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी कोषाध्यक्षांच्या घरावर ईडीची धाड
युएईमधील हॉटेलमध्ये पाकिस्तान्यांना ‘नो एंट्री’? भारतीय-अमेरिकन पासपोर्टला परवानगी
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त आयकर अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा
डुप्लिकेट चावीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
साखरेची साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने नवा स्टॉक लिमिट नियम लागू केला आहे. दरमहा १० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणारे मोठे डीलर्स, बिस्कीट आणि कन्फेक्शनरी कंपन्यांना आता १५ दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. हा नियम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभर लागू राहणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचा कृत्रिम तुटवडा आणि अनावश्यक भाववाढ रोखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, साखरेसोबतच इंधन, गहू आणि कांद्याच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. अमेरिका-इराणमधील तणाव आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परिसरातील अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ९२ डॉलरच्या पुढे, तर डब्ल्यूटीआय क्रूड ८५ डॉलरच्या पुढे गेल्याने भारताच्या आयात खर्चावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलवाढीचा परिणाम वाहतूक खर्च आणि त्यातून विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची भीती आहे.
रशिया-युक्रेन संघर्षामुळे ब्लॅक सी भागातून होणाऱ्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. जागतिक बाजारात गव्हाचा दर प्रति बुशेल ६.७ डॉलरपर्यंत पोहोचला असून, भारतीय बाजारात गेल्या महिन्यात गव्हाच्या दरात सुमारे ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या दरवाढीचा थेट परिणाम पीठ, ब्रेड आणि गव्हापासून तयार होणाऱ्या इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवर होऊ शकतो.
कांद्याच्या दरानेही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. खरीप हंगामातील नव्या कांद्याची आवक उशिराने सुरू झाल्याने किरकोळ बाजारातील कांद्याचा सरासरी दर ₹३७.२० प्रति किलोवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात कांद्याचा दर सुमारे ₹२६.८६ प्रति किलो होता. त्यामुळे साखर, गहू, कांदा आणि इंधन या चारही आघाड्यांवर वाढलेला दबाव आगामी सणासुदीत घरगुती बजेटसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
