उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात पोलिसांनी बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाबुरा गावात बेकायदेशीर धर्मांतरण सुरू असल्याचा खेळ पोलिसांनी उघडकीस आणला. ५ एप्रिल रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी छापेमारी करत या प्रकरणात कारवाई केली असून १० आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बजरंग दलाच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार आणि बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सत्य प्रकाश यांनी आरोप केला की, गावात आयोजित ‘प्रार्थना सभे’च्या माध्यमातून लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात होते.
एफआयआरनुसार, सभेत उपस्थित लोकांना असे सांगितले जात होते की त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही तर आयुष्यभर आजार, गरिबी आणि दुःख भोगावे लागेल. तसेच धर्मांतरासाठी प्रलोभनेही दिली जात होती. या प्रकरणात राजेश गौतम उर्फ सोनू गौतम, विनोद यादव उर्फ मिंटू, निशा, मंजू गौतम, शीला देवी, प्रमोद आणि विकास मौर्य यांच्यासह एकूण १० जणांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मुख्य आरोपी विनोद यादव घटनास्थळावरून फरार झाला असून त्याची मोटरसायकल आणि एक बायबल तेथेच सापडली. त्याच्यासोबत आणखी दोन आरोपीही फरार झाले आहेत. पोलीस निरीक्षक शेष कुमार शुक्ला यांनी सांगितले की फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.
हे ही वाचा:
११,१६६ कोटींच्या मनोरी डीसॅलिनेशन प्रकल्पाला मंजुरी
खेळण्याच्या कारमध्ये बॉम्ब बसवून हल्ल्याची होती योजना
मालदामधील न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घातल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे
संवेदनशील लष्करी मोहिमेची माहिती उघड करणाऱ्या पत्रकारांवर ट्रम्प संतापले
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांचा एक परिचित दीर्घकाळ आजारी होता आणि उपचार करूनही त्याला आराम मिळत नव्हता. त्यावेळी त्याची भेट आरोपी राजेश गौतम याच्याशी झाली, ज्याने त्याला प्रार्थना सभेला येण्याचे आमंत्रण दिले आणि त्यामुळे आजार बरा होईल, असा दावा केला. संशय आल्याने तक्रारदार त्या परिचितासह घटनास्थळी गेला, जिथे कथित धर्मांतराशी संबंधित हालचाली दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. बेकायदेशीर धर्मांतराचे पुरावे आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
