या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. नागरिकांनीही सावध राहून संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ देणे, हेच आजच्या परिस्थितीत राष्ट्रसेवेचे सर्वात जबाबदार रूप ठरेल.
हे ही वाचा:
“पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल” पाक संरक्षण मंत्री असे का म्हणाले?
१९ ऑक्टोबरलाच लीड मिळाला होता…सिंदूर २.० चे संकेत; अल फलाहचा चेअरमनच दाखलेबाज
दिल्लीतील स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या!
कारचा पुलवामा आणि फरिदाबादशी संबंध हा केवळ योगायोग?
दिल्ली येथे ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार उमर महमूद नावाचा तरुण डॉक्टर चालवत होता, असे तपासात निष्पन्न झाले असल्याचे वृत्त आहे. मूळ काश्मीरमधील पुलवामाचा असलेला उमर महमूद फरिदाबाद येथील अल-फराह मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होता. सोमवारी फरिदाबाद येथे उघडकीस आणलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवा-उल-हिंदच्या नेटवर्कचे म्होरके असलेल्या डॉ. आदिल अहमद राथर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्याशी त्याचा काही संबंध होता काय याबाबत तपास सुरु आहे.
गेल्या चोवीस तासात तपास यंत्रणांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली असता, स्फोटापूर्वी संबंधित कार लाला किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास उभी होती आणि तो संपूर्ण काळ उमर महमूद कारमध्येच बसून राहिला होता असे निष्पन्न झाले असल्याचे वृत्त एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिले आहे.
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, स्फोट झाला ती कार मार्च महिन्यापासून अनेकदा विकली गेली होती. गुरुग्राम येथे राहणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीने ती गाडी मार्च २०२५ मध्ये ओखला येथील देवेंदर नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर, देवेंदरने ती गाडी अंबाला येथील एका व्यक्तीला विकली. अंबाला येथून त्या कारची पुलवामा येथे पुन्हा विक्री झाली.
स्थानिक लोकांना वापरून बॉम्बस्फोट घडवण्याची कार्यपद्धती पुन्हा वापरात?
१९९२ साली मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतरच्या काळात राजधानी दिल्ली, भारताची आर्थिक राजधानी मुंबई यासह देशभरातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले. २०१४ पासून देशात खोलवर वसलेल्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट झालेले नाहीत. सीमावर्ती राज्यांमधील घुसखोरी आणि सीमापार दहशतवादाच्या घटनांच्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक्स आणि ऑपरेशन सिंदुरानंतर मोठी घट झाली आहे. जंगल भागातील अतिडाव्या दहशतवादाला देखील केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईमुळे आळा बसला असून नक्षलवादी दहशतीचा अंत दृष्टीक्षेपात येत आहे.
सन्मानित पेशातील लब्धप्रतिष्ठित लोकांना पुढे करण्याचे धोरण?
अशा परिस्थितीत भारतात अशांतता माजवण्यात रस असलेल्या परकीय शक्तींनी स्वतः नामानिराळे राहून स्थानिक लोकांना वापरून देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जुनी कार्यपद्धती पुनरुजीवित केली असण्याची संभावना आहे. मात्र गेल्या काही दिवसातील घटनांमध्ये डॉक्टर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्सना केलेल्या अटकां यावेळी ही कार्यपद्धती राबवताना त्यात थोडा बदल करून डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनियर अशा सन्मानित पेशातील लब्धप्रतिष्ठित लोकांना पुढे करण्याचे धोरण स्वीकारल्याकडे निर्देश करतात.
अशा सन्मानित पेशातील लब्धप्रतिष्ठित लोकांना समाजात महत्वाचे स्थान मिळत असल्याने त्यांच्या कारवाया उघडकीस आणणे तपास यंत्रणांना अवघड जाते हे यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वानीच सावध राहून तपास यंत्रणांना आणि पोलिसांना सहकार्य करणे अत्यावश्यक ठरते.
