गाण्यांच्या आवाजावरून वाद; विक्रोळीत कुटुंबावर चाकूहल्ला

पिता-पुत्राचा मृत्यू

गाण्यांच्या आवाजावरून वाद; विक्रोळीत कुटुंबावर चाकूहल्ला

मुंबई : मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान विक्रोळी पश्चिमेतील राहुल नगर परिसरात रक्तरंजित हल्ल्यात झाले. दोन कुटुंबांतील वादातून एका कुटुंबावर चाकू आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (४०) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पार्कसाईट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहुल नगर येथे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबांमध्ये पूर्वीपासून घरगुती कारणावरून वाद होता. त्यातच मोठ्या आवाजात गाणी लावल्यावरून पुन्हा वाद झाला. वाद वाढत गेल्याने आरोपींनी सुनील विश्वकर्मा यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
हे ही वाचा:
पुणे विषारी दारू प्रकरणी सूत्रधारासह संपूर्ण टोळीवर मकोका

पश्चिम बंगालमध्ये १,२७९ मशिदींवरून भोंगे हटवले

उपोषण सोडण्यासाठी राहुल गांधींकडून प्रतिसादच मिळाला नाही!

‘बिइंग ह्यूमन’ ज्वेलरी प्रकरणात सलमान खानसह बहिणीला समन्स

आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धारदार चाकूने कुटुंबातील सदस्यांवर वार केले. या हल्ल्यात सुनील, त्यांचा मुलगा श्लोक, पत्नी अंजू आणि लहान मुलगा विवान हे चौघे गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुनील आणि श्लोक यांना मृत घोषित केले. अंजू आणि विवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारवाई करत सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version