वडाळा पूर्व येथील शांतीनगर परिसरात गुरुवारी एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रेहाना सद्दाम हुसेन खान (वय २ वर्षे १० महिने) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर परिसरातील ज्या इमारतीत रेहाना आपल्या कुटुंबीयांसह राहत होती, तिथे गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होता. दरम्यान, २५ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा सुरळीत झाला. याच वेळी रेहाना आणि तिची आई नूरजहा खान घराच्या दिशेने जात होत्या. इमारतीला असलेल्या लोखंडी शिडीवरून वर जात असताना, अचानक शिडीमध्ये वीजप्रवाह उतरला. यामुळे रेहानाला जोरदार विजेचा धक्का लागला आणि ती बेशुद्ध पडली.
हे ही वाचा:
साई सुदर्शनचे श्रीलंकेत दमदार शतक
पुस्तकाच्या ‘कृष्ण’ नावावरून वादंग; एनसीईआरटीने दिले स्पष्टीकरण
४३ कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
बांगलादेशी नागरिकांसाठी पुन्हा पर्यटन व्हिसा सेवा सुरू
कुटुंबीयांनी रेहानाला तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला ‘दाखलपूर्व मृत’ घोषित केले. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेबाबत सध्या कोणतीही संशयित तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली आहे. तसेच, इमारतीतील वीजपुरवठ्याच्या तांत्रिक तपासणीसाठी ‘बेस्ट’ प्रशासनालाही पत्र देण्यात आले आहे.
