मालेगाव उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर लावल्याप्रकरणानंतर वाद उफाळला. त्यानंतर उपमहापौर शाने हिंद यांनी तो फोटो हटवला. त्यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाला नवी फोडणी मिळाली आहे. या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. त्यांनी शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना एकाच पातळीवर आणून ठेवले आहे.
सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने विचार पुढे नेला आहे, अगदी त्यांच्यांच मांदियाळीमध्ये, त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, अर्थात भूमीपुत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”.
हे ही वाचा:
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
निवडणुकीनंतर पहिल्याच भाषणात तारिक रहमान यांनी भारत संबंधांवर काय म्हटले?
इंडिगो १००० पायलट्सची करणार नियुक्ती
“शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी राहुल गांधींचे खोटे कथानक”
फडणवीसांनी घेतला समाचार
सपकाळांच्या त्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, अशी वक्तव्ये करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे हे निंदनीय आहे. महाराजांनी मुघलांच्या जोखडातून मुक्त केले आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य स्थापन करणारे शिवराय होते. हजारो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची महाराजांशी तुलना करणे हे मुस्लिमांच्या लांगुलचालनाचे उदाहरण आहे. असे वक्तव्य आम्ही या जन्मात ऐकलेले नाही. आम्ही हे सहन करणार नाही.
