पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारताच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तमिळनाडूतील मंदिरांतून अनेक वर्षांपूर्वी चोरीला जाऊन परदेशात पोहोचलेल्या तीन अमूल्य प्राचीन पुरावशेष भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत करत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचे आभार मानले.
भारतात परत येणाऱ्या पुरावशेषांमध्ये देवी भद्रकालीशी संबंधित कांस्य त्रिशूळ, नंदीची ग्रॅनाइटमधील मूर्ती आणि सहा मुखांच्या भगवान कार्तिकेय (स्कंद) यांची दगडी मूर्ती यांचा समावेश आहे. हे तिन्ही पुरावशेष ११व्या आणि १२व्या शतकातील असून, ते तमिळनाडूतील ऐतिहासिक मंदिरांतून चोरीला जाऊन नंतर ऑस्ट्रेलियातील संग्रहालयांमध्ये पोहोचले होते.
तमिळनाडूच्या आयडॉल विंग-सीआयडीने केलेल्या तपासात या मूर्तींचा उगम राज्यातील मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील म्युच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटी (MLAT) अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने या प्राचीन वस्तू भारताला परत करण्यास सहमती दर्शवली.
भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी या सांस्कृतिक सहकार्याचे स्वागत केले. त्याचबरोबर भारतानेही चेन्नई सरकारी संग्रहालयात जतन करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट नेशन्स समुदायातील एका पूर्वजाचे अवशेष ऑस्ट्रेलियाला परत करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत सहमती दर्शवली. यामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सहकार्य अधिक दृढ होणार असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
कीव्हवर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले!
गाझामधील हवाई हल्ल्यांत हमासचे दोन कमांडर ठार
“जम्मू-काश्मीर भारताचाच”; ढाक्यात चुकीच्या नकाशावर भारताचा आक्षेप
आईच्या हत्येप्रकरणी नवे वळण; वडिलांच्या मृत्यूबाबतही मुलीवर आरोप
गेल्या काही वर्षांत भारताने परदेशात तस्करी करून नेण्यात आलेल्या प्राचीन मूर्ती आणि सांस्कृतिक वारसा परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी भारतातील विविध मंदिरांतून चोरीला गेलेल्या शेकडो पुरावशेष भारताकडे परत सुपूर्द केले आहेत. आता तमिळनाडूतील या तीन ऐतिहासिक मूर्तींच्या पुनरागमनामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठीच्या प्रयत्नांना आणखी मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
