भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नेपाळ क्रिकेटसाठी दौरा जाहीर केली आहे. पहिल्यांदाच इंडिया ‘ए’ संघ डिसेंबर २०२६ मध्ये नेपाळ दौऱ्यावर जाणार असून, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेमुळे भारत आणि नेपाळमधील क्रिकेट संबंधांना नवे बळ मिळणार असून नेपाळच्या क्रिकेटच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
BCCI आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या दौऱ्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मालिकेतील तिन्ही सामने काठमांडूतील कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहेत. पहिला सामना ९ डिसेंबर, दुसरा ११ डिसेंबर आणि तिसरा व अंतिम सामना १३ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा:
“१५ जुलै रोजी पाकिस्तान विधानसभेपासून स्वातंत्र्य घोषित करू”
लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे ‘बीएसई’वर शानदार पदार्पण
ठाण्यातील प्रसिद्ध फूड आउटलेटवर FDA ची धडक कारवाई !
इंडिया ‘ए’ संघात आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे अनेक युवा खेळाडू आणि वरिष्ठ भारतीय संघाच्या उंबरठ्यावर असलेले प्रतिभावान क्रिकेटपटू सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळच्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याचा मौल्यवान अनुभव मिळणार आहे. दुसरीकडे, भारतीय युवा खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय वातावरणात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा मजबूत करण्याची ही मोठी संधी असेल.
गेल्या काही वर्षांत नेपाळने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करत त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता इंडिया ‘ए’ सारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्याने नेपाळच्या क्रिकेटला नवे बळ मिळणार आहे. भारत-नेपाळ क्रिकेट सहकार्याच्या दृष्टीने ही मालिका ऐतिहासिक मानली जात असून, चाहत्यांनाही रोमांचक क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे.







