बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या हिंदू युवकाने ईशनिंदा केली नव्हती!

पोलिसांनी सांगितले की, कोणतेही पुरावे नाहीत

बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या हिंदू युवकाने ईशनिंदा केली नव्हती!

बांगलादेशमध्ये इक्बाल मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसा आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. यादरम्यान, अल्पसंख्याक हिंदू युवक दीपू चंद्र दास याची जमावाने मारहाण करून हत्या करण्यात आली होती. पण ईशनिंदा केल्यामुळे त्याची हत्या केल्याचा जो आरोप होता, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आता समोर आले आहे.

या प्रकरणात बांगलादेशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मैमनसिंह येथे मारहाण करून ठार करण्यात आलेल्या हिंदू युवकाने धार्मिक भावना दुखावणारे किंवा अपमानास्पद विधान केले होते, याचे कोणतेही थेट पुरावे आढळलेले नाहीत.

दीपू चंद्र दासवर त्याच्याच कारखान्यातील एका मुस्लिम सहकाऱ्याने ईशनिंदा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जमावाने त्याला अत्यंत निर्दयपणे ठार मारले. १८ डिसेंबरच्या रात्री जमावाने दीपूची हत्या केली आणि इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्याचा मृतदेह झाडाला लटकवून पेटवून दिला.

मैमनसिंह येथील आरएबी-१४ चे कंपनी कमांडर एम.डी. समसुज्जमां यांनी बांगलादेशी वृत्तपत्र द डेली स्टार ला सांगितले की, मृत व्यक्तीने फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही विधान केले असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत.

हे ही वाचा:

राम सुतार : सर्वोच्च उंचीचे शिल्पकार!

समाजवादी पार्टी सर्व बाजूंनी संपुष्टात येणार

ईशान किशनला टी-२० विश्वचषक २०२६ संघात स्थान

राहुल गांधी जर्मनीत भारतविरोधी लोकांना का भेटले?

ते पुढे म्हणाले की, ना स्थानिक रहिवासी आणि ना वस्त्रउद्योगातील कामगार अशा कोणत्याही कृतीकडे बोट दाखवू शकले. समसुज्जमां यांनी सांगितले, “आता प्रत्येकजण सांगत आहे की त्यांनी स्वतः दीपूला असे काही बोलताना ऐकले नाही. कोणीही असा दावा केलेला नाही की त्यांनी प्रत्यक्ष धर्माला ठेस पोहोचवणारे काही ऐकले किंवा पाहिले. परिस्थिती बिघडल्यावर कारखाना वाचवण्यासाठी त्याला जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर चौकशीनंतर आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. याशिवाय, मैमनसिंहचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहम्मद अब्दुल्ला अल मामून यांनी सांगितले की, पोलिस आणखी तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

दरम्यान, कोअ‍ॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (कोएचएनए) या संघटनेने दीपू दासच्या निर्घृण हत्येनंतर बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि जागतिक समुदायाच्या शांततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने या अमानुष घटनेचा निषेध केला असून, बांगलादेश अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचा इशारा दिला आहे, ज्याचा सर्वाधिक फटका हिंदूंना बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version