अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या विक्षिप्त स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहेत. ते कधी काय बोलतील, कधी काय करतील हे सांगता येत नाही. आता इराणशी झालेल्या युद्धानंतर ट्रम्प हे रोज नवनवे दावे करत असतात. त्यामुळे ते कधी खरं बोलतात, कधी खोटं बोलतात की त्यांचं सगळंच बोलणं खोटं असतं हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे अशा त्यांच्या या विक्षिप्त स्वभावामुळे भारत त्यांच्या बोलण्यानुसार कोणतीही भूमिका घेत नाही. भारत आपल्या तटस्थ भूमिकेवर ठाम आहे.
मात्र भारताच्या या भूमिकेवर विरोधकांना मिरच्या झोंबतात. ट्रम्प काहीही बोलले की मोदी कुठे आहेत, ते का बोलत नाही, त्यांनी रोखठोक उत्तर द्यावं वगैरे अपेक्षा केल्या जातात. त्यावरून विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. पण भारताचे परराष्ट्र धोरण ठरलेले आहे. त्यानुसार भारत कुणाबद्दलही थेट आपली मते ठोकून मोकळा होत नाही. त्याचे परिणाम काय होतील, देशाच्या हिताला त्यामुळे बाधा पोहोचेल का, याचा विचार करूनच मतप्रदर्शन केले जाते. संयम बाळगला जातो, विरोधक म्हणतात म्हणून लगेच बाह्या वर करून अंगावर धावून जाण्याचे भारताचे धोरण नाही.
आता ट्रम्प यांनी आपल्या सोशल ट्रुथ या अकांऊंटवर मायकेल सेवेज नावाच्या एका व्यक्तीची पोस्ट शेअर केली. ज्यात भारत आणि चीन तसेच इतर काही देशांना नरकाची उपमा देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी ही पोस्ट का शेअर केली हे विचारण्याची सोय नाही. कारण ट्रम्प केव्हा काय करतील याचा नेम नाही. पण त्यावर भारताने स्पष्ट प्रतिक्रिया देत ही पोस्ट योग्य नाही, अनावश्यक आहे, अशी टिप्पणी केली आणि या पोस्टबद्दल एका अर्थाने ट्रम्प यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली. त्यावर नंतर अमेरिकेकडून सारवासारव करण्यात आली. अमेरिकेत सध्या सारवासारव नावाचे वेगळे खाते नक्कीच उघडण्यात आले असणार. कारण ट्रम्प कधी काय बोलतील, त्याचे काय अर्थ निघतील, कुणाशी कसे संबंध बिघडतील याची कोणतीही खात्री नसल्यामुळे त्यांनी केलेल्या विधानांची सारवासारव करण्यासाठी वेगळे खाते निर्माण केले गेले असेल.
आता ट्रम्प यांनी हे विधान केल्यावर त्याला भारताने आपल्या मुत्सद्देगिरीनुसार उत्तर दिले पण त्यावर मुंबईतील इराणच्या दूतावासाने ट्रम्प यांना चपराक हाणली. त्यांनी त्या जाहिरातीप्रमाणे एक बार तो आओ भारत मे अशी साद अमेरिकेला घातली. भारत नरक आहे म्हणणाऱ्या अमेरिकेला भारतात कशी प्रगती झाली आहे, याचा दाखला दिला. मुख्य म्हणजे इराणच्या दूतावासाने महाराष्ट्राचा उल्लेख करत इथले निसर्गसौंदर्य, इथली बेस्ट बस, गणेशोत्सव, ढोलताशे, सुंदर रस्ते, धबधबे यांचा उत्तम वापर करत ट्रम्प यांचे सदर विधान कशी बकवास आहे, हे सांगितले आणि एकदा भारतात येऊन पाहा मग बोला असा तडाखा दिला.
मुंबईतील इराणच्या दूतावासाप्रमाणेच हैदराबादमधील इराणच्या दूतावासानेही ट्रम्प यांच्यावर टीका केली आणि भारत, चीन या कशा प्राचीन संस्कृती असल्याचा उल्लेख केला. पण यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, इराणच्या दूतावासांनी ट्रम्प यांना जी चपराक हाणली आहे ती भारतातील विरोधकांनाही आहे. जे गेल्या काही वर्षात भारताच्या संस्कृतीला विसरूनच गेले आहेत. भारताच्या संस्कृतीबद्दल, प्रथा परंपरांबद्दल, प्राचीन हिंदू धर्माबद्दल ते बोलायलाही घाबरत आहेत. उत्सव, देवधर्म, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा अशा सगळ्यांचाच विसर विरोधकांना पडला आहे किंवा त्यांनी स्वतःच्या डोक्यातूनच ते विषय काढून टाकले आहेत. किंबहुना, भारतातील काँग्रेससारखा विरोधी पक्ष जो कधी या देशावर स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्षे राज्य करत होता, तो हिंदू संस्कृतीवर विषारी विधाने करू लागला आहे. काँग्रेससोबत असलेले डीएमके, समाजवादी पार्टी हे पक्षही हिंदू धर्मावर घाणेरड्या भाषेत व्यक्त झाले आहेत. हिंदू धर्माबद्दल चांगले बोलणे म्हणजे भाजपाचे कौतुक करण्यासारखे आहे, असा मूर्खासारखा युक्तिवाद त्यांनी करायला सुरुवात केली आहे. कुंभमेळा, राम मंदिर यावरून तर जवळपास सगळेच विरोधी पक्ष प्रचंड निराश आणि हताश झालेले आपण पाहिले आहेत.
भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल इराण बोलतोय पण इथल्या विरोधकांना ते बोलण्याचीही सोय राहिलेली नाही. इराण भारतातला विकास दाखवतोय, विशेष म्हणजे मुंबईतील कोस्टल रोडचे सौंदर्य त्यांनी आपल्या व्हीडिओतून दाखवले आहे. पण त्याविषयी विरोधक अनेक वर्षे मूग गिळून गप्प आहेत. त्या अर्थाने या विरोधकांना इराणनेच मारलेली ही चपराक आहे.
खरे तर, ट्रम्प यांनी भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला विनाकारण नाक खुपसण्याचा प्रयत्न केला. आपणच हे युद्ध थांबवले असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात आपण त्याचा इन्कार केला. या युद्धात किती विमाने पडली याचा सातत्याने वेगवेगळे आकडे देत ट्रम्प सांगत राहिले पण त्याबद्दलही भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यावर विरोधक मजा घेत राहिले. मोदी ट्रम्प यांना का बोलत नाहीत, का उत्तर देत नाहीत, असा सवाल ते विचारत राहिले. बराचवेळ एखाद्या ठिकाणी खाजवल्यावर बरे वाटते तशीच काहीशी स्थिती विरोधकांची झालेली आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स ९८२ अंकांनी कोसळला
कोकणात डेटा सेंटरचा मोठा प्रकल्प; ₹१.४३ लाख कोटींची गुंतवणूक
१५२ पैकी ११० जागांवर भाजपच… पहिल्या टप्प्यानंतर अमित शाह यांचा दावा
मायक्रोसॉफ्टकडून कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती ऑफर
खरे तर आपल्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरबाबतचे स्पष्टीकरण वेळोवेळी दिले तरीही विरोधकांना केवळ खालच्या दर्जाचे राजकारणच करायचे असल्यामुळे त्यांनी ट्रम्प, अमेरिका, पाकिस्तान यांच्या बाजू उचलून धरल्या. भारताने यासंदर्भात कधीही आततायी भूमिका घेतली नाही उलट अमेरिका, पाकिस्तानचे तोंड वारंवार आपोआपच फुटले. भारताला काहीही करावे लागले नाही. आता इराण युद्धातही भारताने आपली तटस्थ भूमिका कायम राखली. त्यामुळे आपल्या देशवासियांचे हित अबाधित राखण्यात मोदी सरकार यशस्वी ठऱले. अमेरिकेची मात्र त्यामुळे चांगलीच चरफड झाली आहे.
पाकिस्तानसारख्या कफल्लक देशाला घेऊन त्यांना या युद्धात मध्यस्थी करावी लागते आहे. पाकिस्तानप्रमाणे भारताने आपल्याशी जीहुजुरी करायला हवी होती, अशी अमेरिकेची अपेक्षा असेल पण तसे काहीही झाले नाही. ही बाब विरोधकांनाही चांगली ठाऊक आहे की मोदी कुठेही झुकले नाहीत. पण राहुल गांधी मात्र सरेंडर शब्दाचा वापर करत डिवचण्याचे काम करत राहिले. त्यामुळे विरोधी पक्षांचा खरा चेहरा यानिमित्ताने उघडा पडला.आताही ट्रम्प यांनी जी पोस्ट करत भारताला नरक ठरविणाऱ्या व्यक्तीला एकप्रकारे पाठिंबा दिला, त्याविरोधात विरोधी पक्षांनी भूमिका घ्यायला हवी होती, पण दुर्दैवाने विरोधी पक्ष इतका कमकुवत आणि गलितगात्र झालेला आहे की, ते मोदींची स्तुती किंवा भारताविरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या उलट बोलण्याची ताकद हरवून बसला आहे. कारण याचा फायदा मोदींना होईल आणि आपले हात पुन्हा रिकामेच राहतील याची त्यांना सतत भीती सतावत असते.
खऱ्या अर्थाने पाहायचे झाले तर २०१४ ला मोदी सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांसाठी भारत हा नरकासमानच झालेला आहे. ते कधीही भारताची प्रगती, भारताची प्रशंसा, भारताचा गौरव याविषयी एक चकार शब्दही काढू शकत नाहीत. भारताची सगळीकडे कशी छीथू होते आहे, भारत कसा सगळ्या क्षेत्रात मागे आहे, हे सांगण्यात विरोधक अग्रेसर आहेत. राहुल गांधी तर वारंवार परदेशात जाऊन भारत कसा मागास आहे, भारताचे कसे वाटोळे झालेले आहे, हे सांगण्यात वेगळा आनंद मानतात. एकीकडे वेगवेगळ्या स्तरावर भारताच्या प्रगतीचे आकडे दिसत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या स्थानी आहे, हे काय भाजपाने पसरवलेले वृत्त नाही, पण त्याबद्दलही विरोधकांना एक कौतुकाचा शब्द काढता येत नाही. त्याबाबतीत काँग्रेसचे नेते शशी थरूर अनेकवेळा भारताच्या धोरणांचे कौतुक करतात, पण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे हे मोदींनाच दहशतवादी म्हणतात.
२०१४पासून देशातील विविध राज्यांत विरोधी पक्षांची पार दुर्दशा झाली आहे, हे वास्तव आहे. याचे कारण केवळ घराणेशाहीवर पोसलेले हे पक्ष सर्वसामान्य जनतेला काहीही देऊ शकत नाहीत, हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्यांना निवडून देऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यास लोक तयार नाहीत. मोदी सर्वांनाच प्रिय आहेत असे नाही, पण त्यांच्याशिवाय, पर्याय कोणताही नाही, हेही लोकांनी ओळखले आहे. किंबहुना, अन्य पर्याय हे आपल्याच नाशाला कारणीभूत ठरतील, असा लोकांचा ठाम विश्वास आहे. मोदींची लोकप्रियता वाढू लागल्यानंतर, देशाचा विकासाचा स्तर उंचावू लागल्यानंतर, अर्थकारणात भारताचे स्थान उजवे ठरू लागल्यानंतर विरोधकांचा धीर खचू लागला आहे. देश विकला गेला आहे, अशी वाक्य उच्चारताना त्यांना काहीही वाटेनासे झाले आहे. एकूणच भारत हा या विरोधकांसाठी राजकीय नरकच बनला आहे. इथे ते नरकयातना भोगत आहेत.
विविध राज्यात काँग्रेस या मुख्य विरोधी पक्षाचीच धूळधाण उडाली आहे. जिथे कधी त्यांचीच सत्ता होती, तिथे शून्यापासून त्यांना आता सुरुवात करावी लागणार आहे. बाकी प्रादेशिक विरोधी पक्ष तर हेटाळणी, डिवचणे यापलीकडे राजकारण नेऊ शकलेले नाहीत. त्यामुळेच असेल कदाचित की विरोधक हे ट्रम्प यांच्या विधानांवर चकार शब्दही काढत नाहीत. ते उलट मोदी सरकारलाच सुनावत आहेत. या नरकयातनातून मुक्त करण्यासाठी मार्ग शोधत आहेत पण ते स्वतः बदलण्यास तयार नाहीत. आम्हाला या नरकयातनांतून बाहेर काढा, अशी आर्त हाक ते देत आहेत. ट्रम्पही आता त्याच नरकयातना भोगत आहेत, विरोधकांना म्हणूनच ते आपलेसे वाटत असावेत.
