मोदींची भविष्यवाणी… पश्चिम बंगालमधील विक्रमी मतदान परिवर्तनासाठी

मोदींची भविष्यवाणी…  पश्चिम बंगालमधील विक्रमी मतदान परिवर्तनासाठी

२०१४ पासून देशात भाजपाचा झंझावात सुरू आहे. विरोधकांचे अनेक किल्ले पडले, परंतु या धुमश्चक्रीत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचे गड मात्र मजबुतीने उभे राहिले. आज या दोन्ही राज्यांत निवडणुका आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात २९४ पैकी १५२ जागांवर आज मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के मतदान झाले. हा आकडा थक्क करणारा आहे. हे विक्रमी मतदान परिवर्तनासाठीच असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ही मते कोणाच्या झोळीत पडली, याचा उलगडा ४ मे रोजी होणार आहे. या दोन राज्यांचे निकाल फक्त भाजपासाठीच नाही, तर देशासाठी महत्त्वाचे आहेत.

कित्येक ज्योतिषांनी ग्रहगोलांचा अभ्यास करून ममता बॅनर्जी यांचे सरकार जाणार असे भाकीत केले आहे. त्यामध्ये प्रशांत कपूर, शर्मिष्ठा दास, पी. व्ही. नरसिम्हा, रुपेन आर. शाह आदींचा समावेश आहे. परंतु, यापैकी अनेक ज्योतिषांनी २०२१ मध्येही ‘ममता जाणार’ असे भाकीत केले होते. अनेक राजकीय विश्लेषकांनीही तसाच अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र उलटे झाले; तृणमूलला छप्परफाड यश मिळाले.

मतदानाचा विचार केला तर यंदा चित्र वेगळे दिसते आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात गेल्या ५० वर्षांतील किमान हिंसाचार झालेला आहे. मतदानाचे विक्रमी आकडे पाहिले तर हे मतदान परिवर्तनासाठीच आहे, असा विश्वास मोदींनी मथुरापूर येथील प्रचारसभेत व्यक्त केला. ते म्हणाले, “अनेक जिल्ह्यांत यावेळी तृणमूलला खातेसुद्धा उघडता येणार नाही.”

यावेळीही ही मंडळी ‘ममता जाणार’ असे भाकीत करत आहेत. ते खरे ठरण्याचीही शक्यता आहे; कारण मृत आणि स्थलांतरितांच्या नावे यंदा मतदान होणार नाही. ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ या उपक्रमाद्वारे घुसखोरांची ९१ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या २४०७ कंपन्या तिथे तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदारांमध्ये उत्साह आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जर ४१ टक्के मतदान झाले असेल, तर सायंकाळी ६ पर्यंत मतदानाचा टक्का ८० टक्क्यांच्या वर जायला काहीच हरकत नाही. लोक मोठ्या संख्येने मतदान करायला बाहेर पडत आहेत, ही बाब खूपच सकारात्मक आहे.

सकाळपासून आलेल्या बातम्यांवर नजर टाकली तर मुर्शिदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. तिथे हुमायून कबीर यांची ‘आम आदमी उन्नयन पार्टी’ आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. याच जिल्ह्यातील डोमकालमध्ये मतदारांना धमकावण्याच्या तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच हिंसाचार घडवण्याचा प्रयत्नही आहे आणि तयारीही. केंद्रीय सुरक्षा दलाच्या उपस्थितीमुळे हिंसाचाराला काही चाप बसला आहे का, हे दिवसाअखेरीस स्पष्ट होईल.

‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’चा या निवडणुकीवर कितपत परिणाम होईल, हे या क्षणी सांगणे कठीण आहे. कारण वगळण्यात आलेल्या ९१ लाख नावांपैकी ५७.४७ लाख नावे हिंदू आणि ३१.१० लाख नावे मुस्लिम आहेत. सीमावर्ती भागातील मतुआ (Matua) जनजातीतील नावांचा यात मोठा भरणा आहे. बाकी नावांमध्ये मृत आणि स्थलांतरितांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. घुसखोर बांगलादेशींना मतदार यादीतून वगळण्यात आणि त्यांना मतदानापासून रोखण्यात निवडणूक आयोगाला यश आले असेल, तर ममता यांना सत्ता राखणे कठीण होणार आहे.

तामिळनाडूमध्येही आज मतदान झाले. ११ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ३७ होता. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकसोबत भाजपाची आघाडी आहे. पीएमके, अम्मा मक्कल मुनेत्र कझगम, तामिळ मनिला काँग्रेस, इंधिया जननायका कट्ची, तमिझागा मक्कल मुनेत्र कझगम, न्यू जस्टीस पार्टी, पुराट्ची भारतम या छोट्या पक्षांना सोबत घेण्यात भाजपाला यश आले आहे. इडापड्डी पलानीस्वामी आघाडीचे नेतृत्व करत आहेत.

सुपरस्टार विजय जोसेफ याचा पक्ष ‘तामिळगा वेत्री कझगम’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. द्रमुकने ‘सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स’ बनवली आहे, त्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. विजय हा ख्रिस्ती आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ख्रिस्ती धर्मीयांचा आकडा ६.१२ टक्के असला, तरी हे प्रमाण प्रत्यक्षात खूप जास्त असावे असा अंदाज आहे. तिथे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले आहे. अनेक धर्मांतरित ख्रिस्ती आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी ख्रिस्ती ओळख लपवतात. ही मते भाजपाची कधीच नव्हती; ती विजयच्या पक्षाला मिळणार असे चित्र दिसते आहे. ते प्रत्यक्षात आले तर त्याचा फटका द्रमुकला बसणार हे निश्चित.

द्रमुकची परिस्थिती फार चांगली नाही. सनातन धर्माला ‘कोरोना, डेंग्यू’ म्हणणारा एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी त्याच्या चेपॉक मतदारसंघातील मंदिरांना भेट देत होता. एका मंदिरात तर त्याने पूजाही केली. ‘अँटी-इन्कम्बन्सी’ची (सत्ताविरोधी लाट) द्रमुकला धास्ती आहे.

पश्चिम बंगालमध्ये घुसखोरीची समस्या आहे. राज्य सरकारचा घुसखोरीला आशीर्वाद आहे. इथे सत्तांतर झाले नाही, तर पश्चिम बंगालचे वाटोळे तर निश्चित आहेच, शिवाय देशाची सुरक्षाही धोक्यात येणार आहे. कारण पश्चिम बंगाल हा घुसखोरांचा ‘गेटवे’ आहे. इथूनच ते देशभरात पसरतात आणि देशाच्या लोकसंख्येचे गणित बिघडवतात. देशातील एक मोठे राज्य गेली १५ वर्षे अराजक आणि अविकासामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले आहे. कोणताही उद्योग इथे गुंतवणूक करण्याचा विचार करत नाही, अशी परिस्थिती आहे. कायदा व सुव्यवस्थेची वाट लागली आहे.

तामिळनाडूला हिंदू आणि हिंदी विरोधी राजकारणाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न द्रमुकच्या काळात झाला. उदयनिधी स्टॅलिन यांनी त्याचे नेतृत्व केले. हा परिवार हिंदू नाही; ते स्वतःला नास्तिक म्हणवतात, परंतु ते ‘क्रिप्टो ख्रिस्ती’ आहेत. देशात असे अनेक नेते आहेत ज्यांनी धर्मांतर केले आहे, परंतु हिंदूंची मते जातील या भीतीने ते हिंदू असल्याचा मुखवटा धारण करतात. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे त्यापैकीच एक.

हेही वाचा :

प. बंगालमध्ये भाजप सरकार आणा; प्रत्येक घुसखोराला हद्दपार करू!

पश्चिम बंगालमध्ये मतदाना दिवशी हिंसाचार; भाजप उमेदवारांवर प्राणघातक हल्ले

आसाममध्ये अवैधरीत्या जनावर वाहतूकीच्या संशयातून २३ जनावरे घेतली ताब्यात

“माझ्या जीवाला धोका; काही झाल्यास खासदार संजय राऊत जबाबदार”

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सत्ताधारी पक्षांचा पराभव होणे देशाच्या अखंडतेसाठी अनिवार्य आहे. भाजपा नेते अण्णामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असताना तिथे खूप मेहनत केली. गावखेड्यांत दौरे करून पक्षाची संघटना मजबूत केली. परंतु अण्णाद्रमुकशी असलेले समीकरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला तिथे एकही जागा मिळाली नाही, परंतु ११ टक्के मते मिळवण्यात पक्षाला यश आले. ही अण्णामलाई यांचीच कमाई आहे. ही मते आणि रालोआतील (NDA) मित्रपक्षांची मते यंदाच्या निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या सोपानापर्यंत घेऊन जातील, असे चित्र दिसते आहे.

या दोन राज्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४२ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होईल. २०२१ मध्ये भाजपाने ७७ जागा जिंकल्या. ज्या १५२ मतदारसंघांत आज निवडणूक झाली आहे, तिथे गेल्या वेळी भाजपाला ५९ जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ २९ एप्रिल रोजी ज्या १४२ मतदारसंघांत निवडणूक होणार आहे, तिथे भाजपाने गेल्या वेळी फक्त १८ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच दुसरा टप्पा भाजपासाठी जास्त खडतर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता हवी असेल, तर पहिल्या टप्प्यात भाजपाला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आणखी किमान ४० जागांची भर घालावी लागेल.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version