“पैसे कमवण्यासाठी अमेरिका दोन देशांना लढवते” पाकचे संरक्षण मंत्री असे का म्हणाले?

“पैसे कमवण्यासाठी अमेरिका दोन देशांना लढवते” पाकचे संरक्षण मंत्री असे का म्हणाले?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तानमधील मंत्र्यांनी केलेली अनेक विधाने ही जगभरातील देशांसाठी हास्यास्पद ठरली तर काही विधानांमुळे पाकिस्तानची नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. यात सर्वात आघाडीवर होते ते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ. पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याची कबुली ते मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे देशाचे दुसरे संरक्षण दल अशी विधाने त्यांच्याकडून संघर्ष काळात केली गेली. अशातच आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते अमेरिकेबद्दल आणि अमेरिकेच्या धोरणांबद्दल बोलताना दिसत आहेत.

शस्त्रे विकण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी अमेरिका दोन देशांमधील युद्धाला आग लावते, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. युद्ध पेटवण्याचे काम हे अमेरिका गेल्या १०० वर्षांपासून करत आहे. अमेरिकेने आतापर्यंत २६० युद्धे लढली आहेत. चीनने तीन युद्धे लढली आहेत पण, तरीही ते पैसे कमवत आहेत. संरक्षण क्षेत्र हे जीडीपीमध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना लढाया कराव्या लागतात. कधी यांना लढवलं, कधी त्यांना लढवलं आणि त्यातून पैसे कमावून ते निघून जातात. अफगाणिस्तान, सिरीया, इजिप्त, लिबिया या देशांमध्ये त्यांनी हेच केलं आहे. पूर्वी हे देश श्रीमंत होते पण आता कर्जात बुडाले आहेत, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

ख्वाजा आसिफ यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्यावर टीका केली जात आहे. गरज पडल्यास पाकिस्तानही अमेरिकेच्या पायाशी लोळण घेत असल्याचे काहींनी म्हटले आहे, तर काहींनी F-16 विमानांचीही आठवण करून दिली आहे. ही विमाने अमेरिकेने पाकिस्तानला देऊ केली होती. ख्वाजा आसिफ यांचे म्हणणे खरे असल्याचेही काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

IPL 2025: शेवटचा सामना, मनापासून जिंकायचंय

रोहित, विराट आणि अश्विनच्या निवृत्तीवर अजीत अगरकर भावुक

आयएसआयच्या संपर्कात असलेल्याला कच्छमधून ठोकल्या बेड्या

आरसीबीचा पराभव, उथप्पाचा दावा – “पंजाब किंग्स बनू शकते टेबल टॉपर!”

ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वी सांगितले होते की, पाकिस्तानने जाणूनबुजून भारतीय ड्रोनना रोखले नाही जेणेकरून त्यांची लष्करी ठिकाणे उघड होऊ नये. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर जबरदस्त टीका केली गेली तर हे उत्तर हास्यास्पद असल्याचा दावा करण्यात आला. यापूर्वी, सीएनएनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ख्वाजा यांना भारतीय विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांबद्दल विचारले असता त्यांनी सोशल मीडियावरील माहिती पुरावे असल्याचा दावा केला होता. यामुळे त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची नाचक्कीही झाली होती. तर, यापूर्वी त्यांनी पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याची कबुलीही दिली होती. शिवाय, संसदेत उभे राहून त्यांनी वक्तव्य केले होते की, मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे देशाचे दुसरे संरक्षण दल आहे. यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

Exit mobile version