अरुणाचल प्रदेशमध्ये निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून मुसळधार पाऊस, अचानक आलेले पूर आणि भीषण भूस्खलनामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसाने परिस्थिती गंभीर बनवली असून अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे. कीई पान्योरसह अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुराच्या प्रचंड वेगामुळे अनेक घरे कोसळली, तर काही ठिकाणी महत्त्वाचे पूल आणि रस्ते वाहून गेल्याने संपूर्ण गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे.
भूस्खलनामुळे डोंगराळ भागातील अनेक रस्ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून बचाव पथकांनाही घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर आणि भूस्खलनाच्या दुहेरी संकटामुळे हजारो नागरिक भयभीत झाले असून अनेक कुटुंबांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी २४,००० पार
कोलकात्यात बांधकामाधीन कारखान्याचे शेड कोसळून १४ कामगार जखमी
“राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला शुभेंदू अधिकारींनी खूप मदत केली”
लग्नपत्रिकेत जन्मतारखेचा उल्लेख अनिवार्य
या नैसर्गिक आपत्तीत किमान तीन जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. पूरग्रस्त भागांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्य सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून प्रभावित नागरिकांना तातडीची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नदीकाठच्या आणि भूस्खलनप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधीच पूर आणि भूस्खलनाच्या तडाख्यात सापडलेल्या अरुणाचलसमोर आता नव्या पावसाचे संकट उभे ठाकले आहे. निसर्गाच्या या तांडवामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
