ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

भारत मंडपम येथे जगभरातून आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांचे केले औपचारिक स्वागत

ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेसाठी भारतात आलेल्या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतरीत्या दिली होती. पंतप्रधान मोदी यांनी सेवा तीर्थ येथे सर्व प्रतिनिधींशी संयुक्त भेट घेतली. नियोजित कार्यक्रमानुसार सायंकाळी ७ वाजता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या वतीने भारत मंडपम येथे रात्रीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी बैठकीत सहभागी होण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची नवी दिल्लीत दाखल झाले. भारत मंडपम येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगभरातून आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांचे औपचारिक स्वागत केले. बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना जयशंकर यांनी जागतिक मुद्द्यांवर भारताची स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “शांतता आणि सुरक्षा या जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहेत. अलीकडील संघर्षांनी संवाद आणि कूटनीतीचे महत्त्व अधिक अधोरेखित केले आहे. या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित जगात समानता आणि सामायिक पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या तत्त्वांचा आदर राखत शाश्वत विकासाच्या दिशेने चर्चा पुढे नेली पाहिजे.”

डॉ. जयशंकर यांनी पुढे सांगितले की, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जागतिक परिस्थिती नव्याने आकार घेत आहे आणि सुशासन तसेच सर्वसमावेशक विकासासाठी त्याचा प्रभावी वापर होऊ शकतो. दहशतवादाविरोधातील सहकार्य मजबूत करण्यासाठीही सर्व देशांचे समान हितसंबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. होर्मुझ सामुद्रधुनी आणि लाल समुद्राचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले की, समुद्री मार्गांमधील अडथळे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील धोके जागतिक आर्थिक स्थैर्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे सुरक्षित आणि अखंड समुद्री वाहतूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसेच सदस्य आणि भागीदार देशांच्या प्रतिनिधीमंडळ प्रमुखांनी सहभाग घेतला आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या परिषदेची संकल्पना “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी बांधणी” अशी आहे. ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मानवता प्रथम’ आणि जनकेंद्रित दृष्टिकोनातून प्रेरित असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची, इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो, मलेशियाचे परराष्ट्र मंत्री दातो सेरी उतामा मोहम्मद बिन हाजी हसन, संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र राज्यमंत्री खलिफा शाहीन अल मरार आणि दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री रोनाल्ड लामोला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

हे ही वाचा:

देशभरात मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन

होर्मुझ तणावाने तेल बाजार पेटला; कच्चे तेल १०५ डॉलरपार

सोनं-चांदी पुन्हा तेजीत; दरवाढीने बाजारात खळबळ

‘देव देश आणि धर्म’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

शुक्रवारी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देश “ब्रिक्स ॲट २० : लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी बांधणी” या विषयावरील विशेष सत्रात सहभागी होणार आहेत. त्यानंतर जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीय व्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा होणार आहे.

Exit mobile version