बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच; हिंदूंची पाच घरे जाळली

पिरोजपूर जिल्ह्यामधील दुमरीतला गावातील घटना

बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच; हिंदूंची पाच घरे जाळली

बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदुंवर हल्ले होत असून पुन्हा एकदा हिंदू कुटुंबियांची घरे जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशमधील पिरोजपूर जिल्ह्यातील दुमरीतला गावात हिंदू कुटुंबाची पाच घरे जाळण्यात आली. हा अल्पसंख्याकांवर लक्ष्यित हल्ला असल्याचा संशय आहे. १८ डिसेंबर रोजी मयमनसिंगमध्ये ईशनिंदेच्या आरोपावरून २९ वर्षीय वस्त्र कामगार दिपू चंद्र दास याच्यावर जमावाने हल्ला करून त्याची हत्या केल्यानंतर आणि त्याचा मृतदेह जाळल्यानंतर एका आठवड्यानंतर ही घटना घडली.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांनी एका खोलीत कापड भरून ते पेटवून दिल्याचा आरोप आहे, ज्यामुळे आग घरात वेगाने पसरली. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, सुरुवातीला ते आत अडकले होते. सकाळी गोळीबार झाल्याने त्यांना जाग आली आणि तेव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना लक्षात आले की, दरवाजे बाहेरून बंद होते. आग लागल्याचे कळताच दोन्ही कुटुंबातील आठही सदस्यांनी टिनचे पत्रे आणि बांबूचे कुंपण तोडून पळून जाण्यात यश मिळवले. तथापि, त्यांची घरे आणि सामान पूर्णपणे जळून खाक झाले. त्यांच्या पाळीव प्राण्यांचा यात मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण राजधानी ढाक्यापासून सुमारे २४० किमी अंतरावर आहे.

पिरोजपूरचे पोलिस अधीक्षक मोहम्मद मंजूर अहमद सिद्दीकी यांनी आगीच्या ठिकाणी भेट दिली आणि तक्रारदारांना घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे, तर तपास सुरू असताना उर्वरित आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये स्थानिक लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे, कारण अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरली होती.

हे ही वाचा:

सिंधू जल करार स्थगितीनंतर चिनाब नदीवर नवा जलविद्युत प्रकल्प

“निष्पाप अल्पसंख्याकाला जिवंत जाळण्यात आले आणि…” काय म्हणाले कवी कुमार विश्वास?

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायले चुकीचे

उस्मान हादीच्या हत्येचा खटला २४ दिवसांत पूर्ण करा!

बांगलादेशमध्ये या वर्षी जून ते डिसेंबर या कालावधीत हिंदू अल्पसंख्याकांवर ईशनिंदेच्या आरोपांशी संबंधित किमान ७१ घटना नोंदवल्या गेल्या आहेत, असे बांगलादेश अल्पसंख्याकांसाठी मानवाधिकार काँग्रेस (HRCBM) ने एका अहवालात म्हटले आहे. HRCBM ने चांदपूर, चट्टोग्राम, दिनाजपूर, लालमोनिरहाट, सुनमगंज, खुलना, कोमिल्ला, गाजीपूर, टांगेल आणि सिल्हेत यासह ३० हून अधिक जिल्ह्यांतील प्रकरणांची नोंद केली आहे.

Exit mobile version