डॉ. केशव बळीराम हेडगेवार; राष्ट्रभक्ती, शिस्त आणि आत्मबलिदानाचे प्रतीक

आज पुण्यतिथीनिमित्त डॉ. हेडगेवारांच्या कार्याचा उजाळा

डॉ. केशव बळीराम हेडगेवार; राष्ट्रभक्ती, शिस्त आणि आत्मबलिदानाचे प्रतीक

नागपूरच्या एका सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबात १ एप्रिल १८८९ रोजी जन्मलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे केवळ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे योद्धे नव्हते, तर हिंदू संघटनेचे प्रणेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक म्हणून त्यांची ओळख आजही राष्ट्रभक्ती, शिस्त आणि आत्मबलिदानाचे प्रतीक मानली जाते. २१ जून ही त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर.

१८९७ साली जेव्हा ब्रिटीश महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाची ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला आणि शाळेत मिठाया वाटल्या गेल्या, तेव्हा अवघ्या आठ वर्षांच्या केशवने ती मिठाई गुलामीचे प्रतीक मानून कचऱ्याच्या पेटीत टाकली. एवढेच नव्हे तर १९०८ मध्ये इंग्रज निरीक्षकाच्या दौर्‍यात त्यांनी वंदे मातरमचा नारा दिला आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा देत शाळेतून निलंबित करण्यात आले. लहान वयातच त्यांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिले.

डॉक्टरी शिक्षण, पण ध्येय वेगळे

कोलकात्यातून वैद्यकीय शिक्षण घेत असताना ते अनुशीलन समिती आणि ‘युगांतर’ सारख्या क्रांतिकारी गटांशी जोडले गेले. ‘केशब चक्रवर्ती’ या टोपणनावाने काकोरी कटात सहभागी झाले. मात्र नंतर त्यांना जाणवले की, भारतासारख्या देशात केवळ शस्त्रक्रांतीने स्वातंत्र्य शक्य नाही. हिंदू समाजाला संघटित करून राष्ट्रीय चेतना निर्माण करणे हीच स्वातंत्र्याची खरी वाट ठरू शकते. या विचाराने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली.

हे ही वाचा:

नाबर गुरुजी शाळा बंद पडली, राज ठाकरेंनी काय केले ?

पंतप्रधान मोदी दोन दिवसांत तीन राज्यांचा करणार दौरा! 

तेलंगणात १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!

तन-मनासाठी वरदान ठरणारा सूर्यनमस्कार

संघाची स्थापना — विजयादशमी, १९२५

२७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांचा उद्देश होता, हिंदू समाजात एकता निर्माण करणे, आत्मविश्वास जागवणे आणि संस्कृतीची पुनर्स्थापना. शाखा पद्धतीद्वारे त्यांनी संघटन बांधले. प्रत्येक स्वयंसेवकाशी व्यक्तिगत संपर्क आणि संवाद ठेवून त्यांनी संघाचा भक्कम पाया रचला. आज RSS हे जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन मानले जाते.

काँग्रेसशी मतभेद, पण राष्ट्रकार्य अविरत

१९२० मध्ये नागपूर काँग्रेस अधिवेशनात त्यांनी ‘पूर्ण स्वराज्य’चा ठराव मांडला होता, जो तत्कालीन नेत्यांनी फेटाळला.
१९३० मध्ये गांधीजींच्या मीठाच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला आणि ९ महिने तुरुंगवास भोगला. मात्र वैचारिक मतभेदामुळे त्यांनी शेवटी स्वतंत्र मार्ग निवडला.

२१ जून १९४० रोजी नागपुरात त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी गुरुजी माधव सदाशिव गोळवलकर यांना उत्तराधिकारी म्हणून निवडले. आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा लाखो स्वयंसेवकांच्या जीवनात झळकते.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे एक द्रष्टे नेता, निर्भय देशभक्त आणि कुशल संघटक होते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त, आज त्यांचे योगदान स्मरणात ठेवून आपण हिंदू समाजाच्या एकतेचा आणि संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा संकल्प करणे, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

Exit mobile version