दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात महत्त्वाची घडामोड घडली असून, कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी (२० जुलै) आपले उपोषण सोडले. संसदेकडे निघणाऱ्या ‘चला संसद’ मोर्चापूर्वी त्यांनी उपोषण मागे घेतले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतर दिपके यांनी १८ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २१व्या दिवशी प्रकृती खालावल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वांगचुक यांच्या समर्थकांनी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हलवण्यात आल्याचा आरोप करत आंदोलन अधिक तीव्र केले. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारत बेमुदत उपोषण सुरू केले होते.
सोमवारी सकाळी जंतर-मंतरवर उपोषण सोडताना दिपके यांनी आंदोलन मागे घेतले नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, उपोषण संपवले असले तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीचा लढा सुरूच राहणार आहे. त्यानंतर हजारो आंदोलकांसह संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान सरकार आणि CJP यांच्यात चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांना सोमवारी अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलावण्यात आले. सरकारकडून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘चला संसद’ मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. संसद परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केल्याचीही माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
मानखुर्दमध्ये बेस्ट बस दुभाजकावर आदळली; पादचाऱ्याचा मृत्यू
ठाकरेंच्या दादरमधील आंदोलनाप्रकरणी तीन गुन्हे दाखल
“जिथे तथ्य, तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते”
सॅलड खाल्लं आणि रुग्णालय गाठलं! अमेरिकेत लेट्यूसमुळे अतिसारचा उद्रेक
हे आंदोलन स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुट प्रकरणे, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, या मागण्यांसाठी सुरू आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला असून, विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला समर्थन दिले आहे.
