“आदित्य ठाकरेंचे अर्थसंकल्पावरील आरोप म्हणजे मनी वसे ते सर्वत्र दिसे!”

अर्थसंकल्पानंतर सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना अतुल भातखळकर यांनी सुनावले खडेबोल

“आदित्य ठाकरेंचे अर्थसंकल्पावरील आरोप म्हणजे मनी वसे ते सर्वत्र दिसे!”

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत सोमवारी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर भाष्य केले. तसेच अर्थसंकल्पानंतर सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना अतुल भातखळकर यांनी खडेबोल सुनावले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प कंत्राटदारांचा असल्याची टीका केली होती. याला अतुल भातखळकर यांनी चोख उत्तर दिले आहे.

अतुल भातखळकर विधानसभेत बोलताना म्हणाले की, भांडवली खर्च हा १ लाख १२ हजार कोटींच्या आसपास दाखवण्यात आला आहे. पण, यावर अनेकांनी टीका केली. कोणी म्हटले की, कर्ज काढून फटाके वाजवण्यासारखे आहे. खरे तर फटाके कोणाच्या कुठे वाजले हे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसले. जनतेने फटाके बरोबर वाजवले, असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, कधीकाळी ज्यांनी आपल्याला अर्थसंकल्प कळत नाही असे जाहीरपणे सांगणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. त्यांचे चिरंजीव (आदित्य ठाकरे) म्हणतात की, हा अर्थसंकल्प कंत्राटदारांचा अर्थसंकल्प आहे. पण या अर्थसंकल्पातील भांडवली खर्च १ लाख १२ हजार कोटी हा मुंबई एमएमआर रिजनपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पासाठी आहे. पण, टीका करणाऱ्यांना पायाभूत सोयीसुविधांमधून निर्माण होणारा रोजगार दिसत नाही. यांना कंत्राटदाराची चिंता आहे कारण मराठीत म्हण आहे की, मनी वसे ते सर्वत्र दिसे. त्यांच्या मनात कायम कंत्राटदार असतात आणि म्हणूनच त्यांना या अर्थसंकल्पात कंत्राटदार दिसत आहेत,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारने अर्थसंकल्प- २०२६-२७ मध्ये दोन लाखांपर्यंतची कर्ज माफी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर यांनी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक केले. तसेच ते म्हणाले की, पुढची तीन वर्ष महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक नसताना राज्य सरकारने केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे.

हे ही वाचा:

इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ‘ब्रह्मोस’! करारावर स्वाक्षरी

बंगळूरूमधील हॉटेल बंदला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

एलपीजी पुरवठ्यातील व्यत्ययामुळे मुंबईतील २०% हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

चीनच्या स्टेल्थ फायटरला भारताचे ‘घातक’ उत्तर!

राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, अशा प्रकारचा अपप्रचार काही पक्ष आणि त्यांचे नेते करत आहेत, असं अतुल भातखळकर म्हणाले. पुढे ते म्हणाले की, वस्तुस्थिती नेमकी उलट आहे, राज्याची वित्तीय तूट फक्त २.८ टक्के आहे. जीडीपीच्या तुलनेत राज्याचे कर्ज केवळ २० टक्के. रिझर्व बँकेच्या निकषानुसार ही मर्यादा २५ टक्क्यांची आहे. आपण मर्यादेच्या खूप आत आहोत.

Exit mobile version