…हे होते धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना विद्यार्थ्यांना लिहिलेले पत्र

…हे होते धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना विद्यार्थ्यांना लिहिलेले पत्र

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर नीट पेपरफुटीप्रकरणी राजीनामा दिला. गेले काही दिवस दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू होते. त्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यात कॉक्रोच पार्टीचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात चर्चाही झाली. अखेर शनिवारी प्रधान यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

विद्यार्थ्य़ांना उद्देशून प्रधान यांनी लिहिलेल्या पत्रात प्रधान यांनी केलेले आवाहन असे होते-

माझ्या प्रिय युवा मित्रांनो,

गेल्या चार दशकांहून अधिक काळ मी विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक सुधारणांच्या कार्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे. मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षणव्यवस्था ही सक्षम राष्ट्राचा पाया असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. देशातील युवकांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या नव्या पिढीची स्वप्ने पूर्ण करणे ही आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील नैतिक बांधिलकी राहिली आहे.

माननीय पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेबाबत काही अनियमितता समोर आल्या. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत भारत सरकारने तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली. तसेच, पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्याचा निर्णयही करण्यात आला.

या संपूर्ण काळात आमचे सर्वात मोठे प्राधान्य २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडणे हे होते. आम्ही ‘संपूर्ण शासन’ या दृष्टिकोनातून काम केले. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारे आणि विशेषतः जिल्हा प्रशासनांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे ही वाचा:

दिल्ली पोलिसांनी आंदोलनात अराजक माजवणारे ४०० चेहरे ओळखले

अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर

एनटीएमध्ये मोठी कारवाई; ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

पालघरमध्ये पावसाचा कहर! सूर्या-वैतरणा धोक्याच्या पातळीवर

विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळे २१ जून २०२६ रोजी पुनर्परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. पहिल्याच दिवसापासून मी या प्रकरणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि कधीही परिस्थितीपासून दूर पळालो नाही. परीक्षा माफियामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, हा माझा ठाम निर्धार होता.

१६ जुलै रोजी जाहीर झालेल्या नीटच्या निकालात अनेक गरीब व वंचित कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवले. हा निकाल समाधानकारक होता. मात्र, या काळातही काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला अत्यंत वेदना झाल्या.

आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्यावर माझा नेहमीच अढळ विश्वास राहिला आहे. देशातील युवकांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांचा मी सदैव आदर केला आहे. ते केवळ भारताचे भविष्य नाहीत, तर नव्या आणि विकसित भारताचे मशालवाहक, शिल्पकार आणि निर्माते आहेत. गेल्या दहा दिवसांतील घडामोडींमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवा शक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. देशातील युवक संभ्रमाच्या जाळ्यात अडकू नयेत, हा माझा निर्धार आहे.

जंतर-मंतर तसेच देशभरातील परिस्थितीचा विचार करून, राष्ट्रविरोधी शक्तींना या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची संधी मिळू नये, देशाची एकता अबाधित राहावी, एका भारतीय विद्यार्थ्याचेही भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी आपला वेळ शिक्षण व करिअर घडविण्यासाठी द्यावा, या उद्देशाने मी मा. पंतप्रधानांकडे माझा राजीनामा सादर केला आहे.

माननीय पंतप्रधानांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आणि ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व व्यक्तींचेही मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

देशसेवा हेच माझ्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय आहे आणि या कार्यासाठी मी सदैव समर्पित राहीन. भगवान जगन्नाथ यांच्या कृपेने, भारतमातेच्या, ओडिशाच्या जनतेच्या आणि देशातील युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी भविष्यातही सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन.

आपला,

धर्मेंद्र प्रधान

Exit mobile version