संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेली कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी ३ वाजल्यापासून गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चर्चा करण्यास आपण तयार असून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असे शहा यांनी स्पष्ट केले.
संसदेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी विरोधकांना चर्चेसाठी औपचारिक पत्र सादर करण्यास सांगितले. “पत्र लिहून सादर करा. आज दुपारी ३ वाजल्यापासून या विषयावर चर्चा होईल आणि मी उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत चर्चा करण्यास तयार आहे,” असे त्यांनी सांगितले. संसदेत थांबून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे,” असे शहा म्हणाले.
मात्र, आता विरोधकांनी ठरवायचे आहे की त्यांना चर्चा हवी आहे की सभागृहाचे कामकाज रोखून व्यत्यय सुरूच ठेवायचा आहे, असे शहा यांनी म्हटले. वारंवार कामकाजात अडथळा आणला जात असेल तर संसदेत प्रवेश करण्याचा अर्थ काय, असा सवाल करत त्यांनी विरोधकांवर सभागृहाचे कामकाज रोखल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील पेट्रोल पंपांना १५ ऑगस्ट पासून टाळे
विलेपार्ल्यात ११व्या मजल्यावरील दोन फ्लॅटला भीषण आग; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
बँक लॉकर उघडला अन् धक्काच बसला; ५० लाखांचे दागिने गायब
घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू
दरम्यान, नीट आंदोलनावरील कारवाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरही शहा यांनी भूमिका स्पष्ट केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार या विषयाच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यास तयार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले. या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विरोधकांची मागणी सरकारने यापूर्वीच मान्य केली असल्याचा दावाही शहा यांनी केला. तरीही विरोधक चर्चेला तयार नसल्याचा आरोप करत शहा म्हणाले की, “विरोधकांना कोणतीही चर्चा होऊ द्यायची नाही. आता कोण पळून जात आहे, हे जनतेलाच ठरवू द्या.”
