अमित शहांचे वक्तव्य ऐकण्यात रस नाही!…राहुल गांधींचा चर्चेपासून पळ

शहांनी संसदेत बोलण्याची तयारी दर्शविल्यानंतर वक्तव्य

अमित शहांचे वक्तव्य ऐकण्यात रस नाही!…राहुल गांधींचा चर्चेपासून पळ

लोकसभेत सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्याची तयारी गृहमंत्री अमित शहांनी दाखविल्यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहांचे काहीही ऐकण्यात आपल्याला रस नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील आंदोलकांवर झालेला लाठीमार, पॅलेट गनचा कथित वापर याबाबत उत्तर देण्याची मागणी करणाऱ्या राहुल गांधींनी आता त्याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधान किंवा त्यांचे “व्याख्यान” ऐकण्यात आपल्याला कोणतीही रुची नाही. देशातील तरुण पिढीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवणे, विशेषतः विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हिंसाचाराबाबत स्पष्टीकरण मिळवणे, हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणाच्या निर्देशाने देण्यात आले आणि एका विद्यार्थ्याची दृष्टी जाण्याच्या घटनेसाठी कोण जबाबदार आहे, हे विरोधकांना जाणून घ्यायचे आहे. राहुल गांधी ही विचारणा करतात पण याच सगळ्या मुद्द्यांवर अमित शहा बोलण्यास तयार असताना ते चर्चेची तयारी दाखवत नाहीत, याबद्दल आरोप प्रत्यारोप होत आहेत.

हे ही वाचा:

करसंकलनाला बूस्टर! थेट करातून ८.११ लाख कोटींचा महसूल

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; सोनं १० आठवड्यांच्या उच्चांकावर

आयएसआय लिंक प्रकरणी दोघांना अटक; एक पाकिस्तानी असल्याचा संशय

२४ तास चर्चा करा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो!

अमित शहा यांनी विरोधकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्याची तयारी असल्याचे म्हटले असून बुधवारी दुपारी २ पर्यंत विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवून चर्चेची तयारी असल्याचे सांगावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ३ वाजेपर्यंत चर्चा होऊ द्या मग मी त्या सगळ्या मुद्द्यांवर उत्तर देईन, असेही अमित शहा म्हणाले.

गृह मंत्रालयाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाच्या पातळीवरून लागू करण्यात आले होते. त्यांनी थेट अमित शाह यांना प्रश्न विचारला की, विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते का. जर असा आदेश गृहमंत्र्यांनी दिला असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा.

Exit mobile version