केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचा “राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये” या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारमधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने दीर्घकाळ सुरू असलेल्या जनआंदोलन आणि राजकीय दबावानंतर राजीनामा देण्याची ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुख्य मागणीला यश
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा कॉकरोच जनता पक्ष आणि आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. शनिवारी केंद्र सरकार आणि कॉक्रोच पार्टी यांच्यात तिसऱ्या फेरीची चर्चा होण्यापूर्वीच प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
चर्चेपूर्वी कॉक्रोच पार्टीने स्पष्ट केले होते की, “धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही आमची तडजोड न होणारी मागणी आहे.”
राजीनाम्याची घोषणा होताच जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते आणि आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाचे केंद्र उभारले होते.
स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारली
धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत स्वतःहून राजीनामा दिला असून त्यांना पदावरून हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारने त्यांना सन्मानजनक निरोप देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. ओडिशातील भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी २०२१ मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
राजीनामा पत्रात काय म्हटले?
राजीनाम्याच्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, “हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही.” ते पुढे म्हणाले, “भारताची युवा पिढी ही देशाची खरी ताकद आहे.”
नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “पहिल्याच दिवसापासून मी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि कधीही त्यापासून दूर पळालो नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य परीक्षा माफियांमुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा माझा निर्धार होता.”
हे ही वाचा:
CJP आंदोलनाला परदेशी निधीचा आधार? केंद्र सरकारचे स्पष्ट उत्तर
महाराष्ट्र टीईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या सूत्रधाराची गचांडी धरली, बिहारमधून अटक
दिल्ली पोलिसांनी आंदोलनात अराजक माजवणारे ४०० चेहरे ओळखले
विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक… दिपकेची पन्नूशी हातमिळवणी ?
गेल्या दहा दिवसांच्या घटनांमुळे व्यथित
पत्रात त्यांनी नमूद केले की, गेल्या दहा दिवसांतील घडामोडींमुळे आपण अत्यंत व्यथित झालो आहोत. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात १८० हून अधिक विद्यार्थी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्या घटनांचा अप्रत्यक्ष उल्लेख त्यांनी केला.
“राष्ट्रविरोधी शक्तींना संधी मिळू नये”
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.
ते म्हणाले, “राष्ट्रविरोधी शक्तींनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, एका विद्यार्थ्याचेही भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी आंदोलनाऐवजी शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित करावे, या उद्देशाने मी पंतप्रधानांकडे माझा राजीनामा सादर केला आहे.”
राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचा संबंध विरोधकांशी, विशेषतः काँग्रेसच्या आंदोलनाशी जोडला जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांना पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना ताब्यात घेण्यात आले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयातील पुढील नेतृत्व कोणाकडे सोपवले जाणार, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.
