लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकार तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या बळाच्या वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
प्रियंका वड्रा म्हणाल्या, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विचारू इच्छिते की, विद्यार्थ्यांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडणे, लाठीचार्ज करणे, पेलेट गन आणि एके-४७चा वापर करण्याची काय गरज होती? ते विद्यार्थी दहशतवादी होते का? देशातील तरुणांवर पेलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला? हा आदेश पंतप्रधानांनी दिला की गृहमंत्र्यांनी? याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. केवळ काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण देश या प्रश्नाचे उत्तर मागत आहे.”
त्या म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी त्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आणि अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीची विचारपूस करण्यासाठी गेल्या होत्या.
प्रियंका गांधी यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि इतर काही नेतेही त्या विद्यार्थिनीला भेटण्यासाठी आले होते. त्या म्हणाल्या, “मी तेथे पोहोचले तेव्हा विद्यार्थिनीची आई अत्यंत दुःखी होती. त्यांनी हात जोडून मला सांगितले, ‘तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद, पण मला आता कुणालाही भेटायचे नाही. कुणाशीही बोलायचे नाही. सकाळपासून मोठमोठे नेते एकामागून एक येत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत. माझ्या मुलीच्या या अवस्थेला जे जबाबदार आहेत, तेही इथे आले. पण का?'”
हे ही वाचा:
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
जपानमध्ये ७.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा
नीट आंदोलनातील गुन्हे घेणार मागे; बिहार-आसाम सरकारचा निर्णय
एनव्हिडियाला मागे टाकत ॲपल पुन्हा अव्वल
काँग्रेसच्या खासदार म्हणाल्या की, त्या आईचे दुःख स्पष्टपणे दिसत होते आणि तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. सरकारवर टीका करताना प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने रोजगारनिर्मिती करणाऱ्या सर्व क्षेत्रांना सातत्याने कमकुवत केले आहे. तसेच, देशातील परीक्षा व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्या म्हणाल्या, “गेल्या १० वर्षांत १५२ प्रश्नपत्रिका फुटल्या. त्यामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. मात्र, पेपरफुटी माफियातील एकाही सदस्याला शिक्षा झालेली नाही.”
सरकारला प्रश्न विचारताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारला देशातील तरुणांची इतकी भीती का वाटते? विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? विद्यार्थी आंदोलनांवरील बळाचा वापर आणि परीक्षा व्यवस्थेतील अपयश यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारने संसदेसमोर आणि देशासमोर उत्तर द्यावे.







