…आणि पाकिस्तान थरथरू लागला, सकाळीच शस्त्रसंधीसाठी फोन आला!

ऑपरेशन सिंदूरबाबत माजी सीडीएस अनिल चौहान यांनी केला उलगडा

…आणि पाकिस्तान थरथरू लागला, सकाळीच शस्त्रसंधीसाठी फोन आला!

ऑपरेशन सिंदूरदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, आपल्या सांगण्यावरून भारत पाकिस्तान शस्त्रसंधी झाली पण आता माजी सीडीएस अनिल चौहान यांनी याबाबतचा उलगडा केला आहे.

एका मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना जनरल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने घेतलेल्या लष्करी निर्णयांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या कारवाईच्या नियोजन आणि अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने १० मे २०२५ रोजी सकाळी भारताशी तातडीने शस्त्रसंधी करण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, भारताने लगेच शस्त्रसंधी स्वीकारली नाही. पाकिस्तानने सकाळी संपर्क साधल्यानंतरही भारताने दुपारपर्यंत लष्करी कारवाई सुरू ठेवली. यामागे एक महत्त्वाचे कारण होते—भारताच्या नियोजित हल्ल्यांपैकी निम्मी कारवाई अद्याप बाकी होती, असा दावा माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केला आहे.

हे ही वाचा:

रेपो दर सलग पुन्हा ५.२५ टक्क्यांवर कायम

लाल समुद्रात भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; १३ भारतीय खलाशी सुरक्षित

‘मेटा’कुटीला…माफी मागा नाहीतर कारवाई

टायफॉईड घरात मुलाखती जोरात

पाकिस्तानचा सकाळी साडेनऊ वाजता संपर्क 

जनरल चौहान यांच्या म्हणण्यानुसार, १० मेच्या सकाळी पाकिस्तानने भारताशी संपर्क साधून संघर्ष थांबवण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानला भारताकडून आणखी मोठ्या कारवाईची भीती वाटू लागली होती.

“सुमारे आठ तासांत त्यांनी फोन केला. आमच्या नियोजित कारवाईपैकी निम्मीही पूर्ण झालेली नव्हती,” असे चौहान यांनी सांगितले. पाकिस्तानने सकाळी साडेनऊच्या सुमारास शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला असतानाही भारताने तो तातडीने स्वीकारला नाही. “आम्हाला विजय अधिक निर्णायक हवा होता,” असे चौहान यांनी स्पष्ट केले.

‘पाकिस्तानला घाबरला’

जनरल चौहान यांच्या मते, पाकिस्तानला भारताच्या हवाई हल्ल्यांचा मोठा परिणाम जाणवू लागला होता. त्यामुळे संघर्ष आणखी वाढल्यास पाकिस्तानचे नुकसान अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात होईल, याची त्यांना जाणीव झाली. भारताने ९ मेच्या रात्रीपासून १० मेच्या दुपारपर्यंत पाकिस्तानमधील ११ लष्करी ठिकाणे आणि हवाई तळांवर हल्ले केले. या कारवाईत विमानांच्या हँगरसह रडार यंत्रणा आणि काही लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याचे चौहान यांनी सांगितले.

भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला की, पाकिस्तानमधील कोणतेही लष्करी ठिकाण भारतीय लष्कराच्या आवाक्याबाहेर नाही.

नूर खान, रहीम यार खान, भोलारी तळ उद्ध्वस्त

चौहान यांनी पाकिस्तानमधील नूर खान, रहीम यार खान आणि भोलारी या लष्करी तळांच्या नुकसानीचाही उल्लेख केला. या तळांवरील नुकसान भरून काढण्यासाठी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या हवाई क्षमतेवर परिणाम झाला आणि त्यानंतर पाकिस्तानला संघर्ष सुरू ठेवण्याऐवजी चर्चा करणे अधिक योग्य वाटू लागले.

‘९ मे रोजी पाकिस्तानची भाषा वेगळी होती’

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीसाठी संपर्क साधला जाणे हे आपल्यासाठी मोठे आश्चर्य असल्याचेही जनरल चौहान यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ९ मे रोजी पाकिस्तानकडून भारताला ४८ तासांत धडा शिकवण्यासारखी आक्रमक वक्तव्ये केली जात होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने भारताशी संपर्क साधला. चौहान यांनी सांगितले की, पाकिस्तानला आपल्या कारवाईचा अपेक्षित परिणाम झाल्याचे वाटत होते. मात्र, भारताच्या प्रत्युत्तरामुळे परिस्थिती झपाट्याने बदलली.

ऑपरेशन सिंदूरची सुरुवात कशी झाली?

७ मे २०२५ रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ही कारवाई केली. पहिल्या टप्प्यात भारताने पाकिस्तानच्या हद्दीत आणि पाकिस्तानव्याप्त भागात असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. हे तळ जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागातील भारतीय लष्करी ठिकाणांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील बहुतांश हल्ले भारतीय यंत्रणांनी निष्प्रभ किंवा अडवले. जनरल चौहान यांच्या मते, पाकिस्ताननेही भारताप्रमाणे खोलवर हल्ले करण्याचा प्रयत्न करण्याची रणनीती आखली होती. मात्र, त्याआधीच भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले. महत्त्वाच्या हवाई तळांवरील धावपट्ट्यांचे नुकसान झाल्याने पाकिस्तानला लढाऊ विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढवणे कठीण झाले. “त्यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास फोन का केला? कारण त्यामागे हवाई शक्तीची ताकद होती,” असे चौहान यांनी सांगितले.

Exit mobile version