पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार अधिकृतपणे सत्तेबाहेर गेले आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ममता बॅनर्जी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. तब्बल १५ वर्षे बंगालच्या सत्तेवर अधिराज्य गाजवणाऱ्या तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी तत्काळ राजीनामा न दिल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला.
हे ही वाचा:
‘मस्का लावणाऱ्या क्विझ मास्टरने तृणमूलला संकटाच्या खाईत लोटले!’
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग
सोन्यात गुंतवणुकीला डिजिटल टच; ‘EGR’ काय आहे?
अमेरिकन सैन्याकडून इराणी ध्वज असलेल्या रिकाम्या तेलवाहू जहाजावर हल्ला
विधानसभा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळाचे अस्तित्व संपुष्टात येते. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करत मंत्रिमंडळ बरखास्त केल्याचे सांगितले जात आहे. राज्यपालांकडे आता नव्या सरकार स्थापनेची जबाबदारी आली असून भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारचा शपथविधी पुढील दोन दिवसांत होऊ शकतो. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून काही आमदारांनी पक्ष बैठकीकडे पाठ फिरवल्याचेही वृत्त आहे. सलग तीन कार्यकाळ सत्ता सांभाळल्यानंतर पक्षाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांत हिंसाचाराच्या घटना समोर आल्या असून भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाच्या हत्येनंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. राज्यातील संवेदनशील भागांत पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
