राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणणार

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती

राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणणार

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (११ फेब्रुवारी) सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहाची दिशाभूल केली आणि निराधार आरोप केले आहेत. त्यामुळे सरकार त्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव (प्रिव्हिलेज नोटीस) आणणार आहे.

अलीकडेच अंतिम झालेल्या भारत-अमेरिका व्यापार करारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करत रिजिजू म्हणाले, “सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल आणि निराधार वक्तव्ये केल्याबद्दल आम्ही राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव दाखल करणार आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजासाठी स्पष्ट नियम आणि प्रक्रिया आहेत. एखाद्या सदस्याने दुसऱ्या सदस्यावर गंभीर आरोप करायचे असल्यास त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागते आणि आरोपांची पुष्टीही करावी लागते.”

ते पुढे म्हणाले की, त्यांनी सभापतींना विनंती केली होती की राहुल गांधी यांनी सभागृहात येऊन आपल्या आरोपांची अधिकृत पुष्टी करावी. “राहुल गांधी यांनी सरकार आणि पंतप्रधानांविरोधात निरर्थक व खोटे आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की पंतप्रधानांनी भारत आणि भारतीय हितसंबंध विकले. कोणत्या आधारावर? त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावरही कोणतीही पूर्वसूचना न देता गंभीर आरोप केले,” असे रिजिजू म्हणाले.

हे ही वाचा:

ट्रम्पनी गळा दाबला म्हणून मोदींनी भारत विकला!

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर सवाल

लंडनमध्ये “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत विद्यार्थ्याने चालवला चाकू

AI कंटेंटवर सरकारची थेट कारवाई

रिजिजू यांनी सांगितले की काँग्रेस नेत्यांनी कोणतेही पुरावे, युक्तिवाद किंवा प्रक्रियात्मक नोटीस न देता आरोप केले.
“त्यांचे संपूर्ण भाषण, त्यातील चुकीची विधाने, खोटे दावे आणि असंसदीय शब्द सभागृहाच्या नोंदीतून वगळले जावेत. विशेषतः त्यांनी केलेले खोटे आणि निराधार आरोप काढून टाकले जावेत,” असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, “मी त्यांना आठवण करून दिली की हे देश कोणी विकू शकत नाही आणि कोणी खरेदीही करू शकत नाही. तरीही राहुल गांधी म्हणाले की कुणीतरी भारत विकला आणि कुणीतरी भारत खरेदी केला. भारताला विकणे किंवा खरेदी करणे याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.”

लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारावर टीका करत सरकारवर “भारत माता विकल्याचा” आरोप केला. त्यांनी या कराराला “पूर्ण शरणागती” असे संबोधले आणि दावा केला की यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे हित धोक्यात आले आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते म्हणाले की, जर इंडिया आघाडीचे सरकार हा करार करत असते, तर अमेरिकेने भारताला समान भागीदार म्हणून वागणूक द्यावी, अशी अट घातली असती.

Exit mobile version