भारत आणि न्यूझीलंड यांनी सोमवार, २७ एप्रिल रोजी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) केला. या करारानुसार न्यूझीलंडला होणाऱ्या १०० टक्के भारतीय निर्यातीवर टॅरिफ सवलत मिळणार आहे. तर न्यूझीलंडहून भारतात येणाऱ्या सुमारे ९५ टक्के वस्तूंवर टॅरिफ सवलत किंवा कपात करण्यात आली आहे. वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि त्यांचे न्यूझीलंडमधील समकक्ष टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
१६ मार्च २०२५ रोजी सुरू झालेल्या या मुक्त व्यापार कराराची नऊ महिन्यांत पूर्तता झाली असून, दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या करारामुळे भारताला सर्व टॅरिफ उत्पादनांवर तात्काळ १०० टक्के शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे सध्या न्यूझीलंडकडून भारतीय निर्यातीवर आकारला जाणारा सुमारे १० टक्के शुल्क कमी होणार आहे. यात वस्त्र व परिधान, चामड्याचे उत्पादने, टोपी, मातीची भांडी, गालिचे तसेच वाहन व त्यांचे सुटे भाग यांचा समावेश आहे.
या करारात पुढील १५ वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तरतूद आहे. ही तरतूद युरोपियन मुक्त व्यापार संघाने (EFTA) भारतासोबत केलेल्या करारातील १०० अब्ज डॉलर गुंतवणूक वचनबद्धतेप्रमाणेच आहे. याशिवाय, या करारात व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या हालचालीसंबंधी अनेक तरतुदी आहेत. न्यूझीलंडने पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या हालचाली आणि शिक्षणानंतर कामाच्या व्हिसासंदर्भात असा करार केला आहे. यानुसार भारतीय विद्यार्थ्यांना न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेताना आणि त्यानंतरच्या विस्तारित वर्क व्हिसासह आठवड्याला २० तास काम करण्याची परवानगी असेल.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल: ७९ कच्चे बॉम्ब सापडल्याचे प्रकरण एनआयएकडे
लष्करी उपग्रहांसाठी खासगी सहभाग गरजेचा
आत्मनिर्भर भारताला बुस्ट! बुलेट ट्रेनचे कोच देशातच होणार विकसित
न्या. स्वर्णकांता शर्मांच्या न्यायालयात मी जाणार नाही!
या करारामुळे भारतीय कुशल व्यावसायिकांसाठी उच्च वेतनाच्या नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील. करारानुसार अशा व्यावसायिकांना तात्पुरते रोजगार व्हिसा दिले जातील, ज्याद्वारे ते न्यूझीलंडमध्ये तीन वर्षांपर्यंत राहून काम करू शकतील. मात्र, या व्हिसासाठी ५,००० चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. वर्किंग हॉलिडे व्हिसा योजनेअंतर्गत दरवर्षी १,००० भारतीय युवकांना १२ महिन्यांसाठी न्यूझीलंडमध्ये अनेकदा प्रवेश घेण्याची संधी मिळेल. दरम्यान, भारताने दूध, क्रीम, ताक, दही, पनीर यांसारख्या सर्व दुग्धजन्य पदार्थांसह काही कृषी उत्पादने या मुक्त व्यापार कराराच्या बाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे.







