सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) मंगळवारी समाजमाध्यमावरील एका पोस्टवरून काँग्रेसवर निशाणा साधला. ही पोस्ट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या संदर्भात करण्यात आली होती.
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, अखेर सुनेत्रा पवार किती दिवस ‘गुंगी गुडिया’ (मूकदर्शक) बनून राहणार आहेत? काँग्रेसवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी विचारले, “‘गुंगी गुडिया’सारख्या अपमानास्पद वाक्प्रचाराचा आधार घेऊन काँग्रेस माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या ऐतिहासिक टीकेला अप्रत्यक्षपणे वैधता देत आहे का?”
पाटील म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद आणि धोरणांबाबत टीकात्मक दृष्टिकोन हे दोन्ही आवश्यक असतात. मात्र, महिलांबाबत कोणत्याही प्रकारच्या अपमानास्पद भाषेला राजकारणाच्या क्षेत्रात स्थान असता कामा नये.
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यानंतर ही टीका सुरू झाली. बीड येथे धनंजय मुंडेंसोबत पत्रकार परिषद घेत असताना पत्रकाराला मुंडे यांनी प्रश्न विचारण्यापासून थांबवले. त्यावरून सपकाळ म्हणाले की, पत्रकाराच्या प्रश्नांना सुनेत्रा पवार उत्तर का देऊ शकल्या नाहीत. त्या गुंगी गुडिया आहेत. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली पाहिजे, त्यांनी अर्थमंत्रीपदाचे काय झाले, हे विचारले पाहिजे. यानंतरच काँग्रेसवरील या टीकेला सुरुवात झाली.
ऐतिहासिक संदर्भांची आठवण करून देताना उमेश पाटील म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली, त्यावेळी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडूनही त्यांच्याबाबत अशाच प्रकारच्या अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला होता.
हे ही वाचा:
मुंबईत नव्या सुविधांसह पुन्हा धावणार मोनोरेल
सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीत तेजी
राममंदिर दान प्रकरणात साधू-संतांचा कोणताही संबंध नाही
ते म्हणाले, “इंदिरा गांधी यांनी आपल्या या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना कोणत्याही वक्तव्याच्या माध्यमातून नव्हे, तर आपल्या कामगिरीच्या माध्यमातून उत्तर दिले होते. बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना जागतिक स्तरावर ज्या प्रकारची मान्यता मिळाली, त्यामुळे त्यांची सर्व स्तरांतून प्रशंसा झाली. एवढेच नव्हे, तर त्यांचे प्रतिस्पर्धीही इंदिरा गांधी यांच्या प्रभावामुळे त्यांची प्रशंसा करण्यास बाध्य झाले होते.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, महिलांच्या संदर्भात अन्यायकारक आणि टीकात्मक ठरणाऱ्या अशा शब्दावलीचा वापर का केला जात आहे? त्यांनी प्रश्न विचारला की, काँग्रेसने वापरलेली ही शब्दावली पूर्वी इंदिरा गांधी यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या टीकात्मक टिप्पणीची स्वीकृती आहे का?







