राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली. यात विशेष बाब म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी केवळ आघाडीच घेतली नाही, तर स्वतः अजित पवार यांचा २०२४ मधील विजयाचा विक्रमही मोडीत काढला आहे. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. त्यांनी २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजय मिळवला आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी १ लाख १ हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, पोटनिवडणुकीच्या अवघ्या १४ व्या फेरीतच सुनेत्रा पवार यांनी १ लाख २१ हजार ८५५ मतांचा टप्पा ओलांडला. यामुळे त्यांनी अजित पवारांचा मागील रेकॉर्ड मोडीत काढला.
सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या असून देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने झाला आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे. करूणा मुंडे यांना १२५ मते मिळाली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाली आहेत.
बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.
हे ही वाचा:
विजय यांच्या समर्थकाने अफवा ऐकून गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न
तथ्यहीन दावे; लिपुलेख मार्गे होणाऱ्या यात्रेवरील आक्षेप भारताने फेटाळला
ट्रम्प यांच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’मुळे भारतीय बाजारात तेजी
मुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्याने बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी महायुतीने अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात राहिले होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील मुख्य राजकीय पक्षांचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे सुनेत्रा पवार या किती मताधिक्याने विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
