‘वंदे मातरम्’च्या पूर्ण आवृत्तीच्या गायनावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून काँग्रेसच्या कार्यकारिणीने पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी म्हणण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसची भूमिका ही ‘तुष्टीकरणाच्या राजकारणा’चा पुनरुच्चार असल्याचा आरोप शाह यांनी केला.
अमित शाह यांनी ‘एएनआय’शी बोलताना काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, १९३७ मध्ये काँग्रेसने घेतलेल्या निर्णयानुसार ‘वंदे मातरम्’ची दोन कडवी गाण्याची भूमिका आता पुन्हा स्वीकारण्यात आली आहे. ‘वंदे मातरम्’चे विभाजन करण्याचा निर्णय हा त्या काळातील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा परिणाम होता, असा दावा शाह यांनी केला. या निर्णयामुळे पुढे फाळणीची परिस्थिती निर्माण होण्यास हातभार लागल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमित शाह यांनी काँग्रेसवर मतपेढीच्या राजकारणासाठी ‘वंदे मातरम्’चा अवमान केल्याचा आरोप केला. स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आणि गीतकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा काँग्रेसने अपमान केल्याचे ते म्हणाले. “तुष्टीकरणाचं राजकारण आता या देशात चालणार नाही,” असा थेट इशाराही अमित शाह यांनी दिला. काँग्रेसने १९३७च्या पक्षाच्या ठरावाला प्राधान्य देत केंद्राच्या सध्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
“आज काँग्रेस पक्ष आपला १९३७ चा पक्षीय ठराव स्वीकारत आहे आणि संसदेचा कायदा फेटाळत आहे. मला याचे आश्चर्य वाटते की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा या देशात तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदारपणे प्रोत्साहन देत आहे. मला या देशातील लोकांना आवाहन करायचे आहे की, एकदा या देशाने ‘वंदे मातरम’चे दोन तुकडे होऊ देण्याची चूक केली होती आणि त्या चुकीचे गंभीर परिणाम आपण भोगले आहेत. आता देशातील जनतेने एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून या देशात तुष्टीकरणाचे राजकारण यापुढे चालणार नाही. हा एक स्वतंत्र देश आहे, स्वातंत्र्यानंतर ८० वर्षांनी, काँग्रेसने १९३७ मध्ये घेतलेल्या निर्णयाबाबत नरेंद्र मोदी सरकारने जी सुधारणा केली आहे, त्याला होणारा कोणताही विरोध या देशातील जनता सहन करणार नाही. भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करतो आणि आम्ही जनतेमध्ये व विधानसभेत याचा जोरदार विरोध करू,” असे अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा:
चिनाब ब्रिजवर वंदे भारत सुसाट; गाठला १०० किमी प्रतितासाचा वेग!
कॅन्सर mRNA थेरपी ठरली गेमचेंजर! मॉडर्नाच्या शेअर्समध्ये १७७ टक्क्यांची झेप
दारू घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी कोषाध्यक्षांच्या घरावर ईडीची धाड
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त आयकर अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक १९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत पक्षाने कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची पहिली दोन कडवीच म्हणण्याची जुनी भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने १९३७ मध्ये घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत ही भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९३७ मध्ये घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल, असे त्यांनी म्हटले.
