काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद मोहिमेत मांडण्यात आलेले मुद्दे नंतर जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनातही पुढे आले. मात्र काँग्रेसच्या या मोहिमेला जंतर-मंतरवरील आंदोलनाइतका प्रतिसाद मिळाला नाही, अशी कबुली थरूर यांनी दिली.
मुंबईत इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्सच्या १५व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना थरूर यांनी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर पक्ष बोलत असले, तरी त्यांचा आवाज आणि भावना प्रत्यक्षात कितपत समजून घेतल्या जात आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
शशी थरूर यांच्या म्हणण्यानुसार, जंतर-मंतरवरील आंदोलनात पुढे आलेले पेपरफुटी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न काँग्रेसने यापूर्वीच ‘छात्रों की गूंज’ मोहिमेत मांडले होते. राहुल गांधी यांनी या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत पेपरफुटीसह विविध प्रश्नांवर चर्चा केली होती. मात्र या प्रयत्नांना जंतर-मंतरवरील आंदोलनाइतका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसने केवळ कोणते मुद्दे मांडले, यापेक्षा ते तरुणांपर्यंत कसे पोहोचले आणि त्यांच्याशी संवाद किती प्रभावी झाला, याचा विचार करण्याची गरज असल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने तरुणांच्या प्रश्नांवर बोलूनही त्यांच्याशी अपेक्षित नाळ का जोडली नाही, असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केला. शिक्षणातील समस्या, हवामान बदल आणि लोकशाहीतील त्रुटी यांसारखे मुद्दे महत्त्वाचे आहेत; मात्र हे मुद्दे तरुणांमध्ये अपेक्षित पद्धतीने प्रतिध्वनित होत नसतील, तर त्यामागचे कारण शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. “आपण तरुणांचे ऐकण्यात कमी पडलो का? जेन झेडच्या भावनांचा ठाव घेण्यात आपण कमी पडलो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
चीप ते शिपपर्यंत सगळे तुम्हालाच करायचे आहे!
पेट्रोल दरवाढीविरोधात पाकिस्तानात संताप; प्रमुख शहरांमध्ये निदर्शने, रॅली
होर्मुज सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला
विंग कमांडर ‘हनी ट्रॅप’; पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप
राजकीय पक्षांमध्ये पदानुक्रम, जुनी व्यवस्था, घराणेशाही आणि राजकीय नेटवर्कचे वर्चस्व असल्याने नव्या पिढीला निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे कठीण होते, असे थरूर यांनी नमूद केले. तरुणांना केवळ मोठ्या नेत्यांच्या मागे उभे राहणे, रॅलींमध्ये सहभागी होणे किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करणे एवढीच भूमिका न देता त्यांना राजकारण घडवण्याची संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रस्थापित राजकीय पक्षांनी बदलत्या पिढीच्या अपेक्षा समजून घेतल्या नाहीत, तर भविष्यात ते अप्रासंगिक ठरू शकतात, असा इशाराही थरूर यांनी दिला.
