पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असले तरी फाल्टा मतदार संघातील निकाल अद्याप शिल्लक होते. किंबहुना, २१ मे रोजी निवडणूक झाली आणि रविवारी त्याचा निकाल लागला. या मतदारसंघातून उभा राहिलेल्या जहांगीर खानने माघार घेतली आणि तिथे आता भाजपाचा उमेदवार निवडून आला.
ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा विश्वासू सहकारी आणि तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता जहांगिर खान याने उमेदवारी मागे घेतल्यानंतर भाजपने फाल्टा मतदारसंघात मोठा विजय मिळवला. त्यामुळे एकेकाळी अभेद्य मानले जाणारे “डायमंड हार्बर मॉडेल” कोसळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एप्रिल २९ रोजीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी अभिषेक बॅनर्जी यांनी फाल्टा मतदारसंघातील नागरिकांना इलेक्ट्रिक स्मशानभूमीची भेट दिली होती. “४ मे रोजी निकाल आल्यानंतर काही लोकांना धक्का बसेल, त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराची योग्य व्यवस्था असणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी म्हटले होते. पण अभिषेक बॅनर्जी यांच्या या वक्तव्याची पुरती माती झाली. भाजपने पश्चिम बंगालमध्ये २९४ पैकी २०७ जागा जिंकून सत्ता मिळवली आणि १५ वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसला विरोधी बाकांवर जावे लागले. त्याच बदलाचा परिणाम फल्टामध्येही दिसला.
भाजप उमेदवार दिबांशू पांडा यांनी १ लाख ४९ हजार ४२१ मते मिळवत मोठा विजय मिळवला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभू नाथ कर्मी दुसऱ्या स्थानावर राहिले, तर “पुष्पा” म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा जहांगिर खान चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. उमेदवारी मागे घेतल्यानंतरही त्याला ६२५७ मते मिळाली.
डायमंड हार्बर कसे बनले TMC चे बालेकिल्ले
२००९ पासून डायमंड हार्बर हा तृणमूलचा मजबूत गड मानला जात होता. हा मतदारसंघ अभिषेक बॅनर्जी यांच्या राजकीय वाढीचा केंद्रबिंदू ठरला. २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांनी ३.२ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. २०२४ मध्ये हा फरक ७.१ लाखांवर गेला. पंचायत निवडणुकांमध्ये टीएमसीने अनेक ठिकाणी बिनविरोध विजय मिळवला होता.
तृणमूलने या यशाचे श्रेय “डायमंड हार्बर मॉडेल” ला दिले. या मॉडेलमध्ये स्थानिक विकास, आरोग्य सुविधा, नागरिकांशी थेट संपर्क आणि कल्याणकारी योजना यांचा समावेश होता. “एका योजनेत हजारो तृणमूल कार्यकर्त्यांनी निधी जमा करून सुमारे ७० हजार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १००० रुपयांची मदत दिली.
हे ही वाचा:
विरोधकांचे आरोप
भाजप आणि डाव्या पक्षांनी मात्र वेगळे चित्र मांडले. त्यांच्या मते, डायमंड हार्बरमध्ये भीती, दडपशाही आणि निवडणूक गैरव्यवहार यामुळे टीएमसीचे वर्चस्व टिकले होते. भाजप नेते अमित मालवीय यांनी डायमंड हार्बरला “गुन्हेगारी आणि निवडणूक गैरव्यवहाराचे केंद्र” म्हटले होते. भाजपने असा आरोपही केला की बांगलादेश सीमेजवळील स्थानामुळे या भागात घुसखोरी, तस्करी आणि मानवी तस्करीचे जाळे सक्रिय होते.
फाल्टा पुनर्निवडणूक आणि संघर्ष
२९ एप्रिलच्या मतदानादरम्यान ईव्हीएम छेडछाड, मतदारांना धमक्या आणि बटणांवर चिकटपट्टी लावल्याचे आरोप झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व २८५ बूथवर पुनर्निवडणूक जाहीर केली.
यावर अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आणि “बांगला विरोधी गुजराती गँग” असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, निवडणूक आयोगाचे पोलिस निरीक्षक अजय पाल शर्मा यांनी कठोर कारवाई सुरू केली. जहांगिर खानच्या घरावर भेट देऊन गैरप्रकार न करण्याचा इशारा दिल्यानंतर जहांगिरने स्वतःची तुलना “पुष्पा” चित्रपटातील पात्राशी करत “झुकेगा नहीं” असे म्हटले होते.
बंगाल निकालानंतर समीकरण बदलले
४ मे रोजी भाजप सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बदलली. मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली. २१ मे रोजी होणाऱ्या पुनर्निवडणुकीच्या दोन दिवस आधी जहांगिर खान यांनी अचानक उमेदवारी मागे घेतली. त्यांनी दावा केला की नव्या भाजप सरकारच्या विकास पॅकेजमुळे ते बाजूला होत आहेत. भाजपचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी जहांगिरची खिल्ली उडवत म्हटले, “पुष्पा म्हणाला होता झुकेगा नहीं, पण आता पुष्पा खाली आला आहे.”
डायमंड हार्बर मॉडेल का कोसळले?
विश्लेषकांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये दिसलेल्या सत्ताविरोधी लाटेचा परिणाम डायमंड हार्बरमध्येही झाला. केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीमुळे मतदारांना भीतीशिवाय मतदान करता आले. अनेक स्थानिकांनी सांगितले की अनेक वर्षांनंतर त्यांनी मुक्तपणे मतदान केले. कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवारानेही आरोप केला की पूर्वी जहांगिर खानच्या भीतीमुळे प्रचार करता येत नव्हता. निकालानंतर जहांगिर खानचे कार्यालय तोडफोडीत उद्ध्वस्त झाले. तृणमूलच्या नेतृत्वाकडूनही त्यांना फारसा पाठिंबा मिळाला नाही. यामुळे एकेकाळी अभेद्य मानले गेलेले अभिषेक बॅनर्जी यांचे “डायमंड हार्बर मॉडेल” आता कोसळल्याचे मानले जात आहे.
