तृणमूलच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांचा राजीनामा

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का

तृणमूलच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांचा राजीनामा

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांना आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि तृणमूलच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांनी गुरुवारी (१६ जुलै) आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, कोयल मलिक यांनी नवी दिल्लीत उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांनी अचानक राजीनामा देण्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कोयल मलिक यांची यावर्षी फेब्रुवारीमध्ये टीएमसीने राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती. एप्रिल महिन्यात त्यांनी राज्यसभेची शपथ घेतली होती. त्यावेळी लोकसेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी हा आपल्या आयुष्यातील नवा प्रवास असल्याचे म्हटले होते. मात्र, केवळ तीन महिन्यांतच त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोयल मलिक यांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच पक्षाचे आमदार मदन मित्रा यांनीही पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत बंडखोर गटात प्रवेश केला होता. त्याआधी काही माजी राज्यसभा सदस्यांनीही टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पक्षातील गळती सुरूच असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, कोयल मलिक यांनी राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या भेटीनंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत कोयल मलिक किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले

दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी

‘अतिथी देवो भव’! महिला पोलिसांच्या मदतीने विदेशी पर्यटक भारावली

होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय खलाशांच्या नियुक्तीवर तात्पुरती बंदी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसला सातत्याने धक्के बसत असून, अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी पक्ष सोडत आहेत. अशा परिस्थितीत कोयल मलिक यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोरील राजकीय आव्हाने आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version