सुवर्ण अक्षरांनी कोरला ‘१००’ चा विक्रम!

सुवर्ण अक्षरांनी कोरला ‘१००’ चा विक्रम!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला असला, तरी अष्टपैलू अक्षर पटेल याने ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळींचा टप्पा गाठणारा भारताचा पहिला फिरकी गोलंदाज होण्याचा मान अक्षरने मिळवला.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याला बाद करत अक्षरने हा ऐतिहासिक टप्पा पार केला. त्याने ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०० बळी घेतले असून, त्याचा गोलंदाजीतील इकॉनॉमी रेट ७.३७ इतका आहे.

भारतीय फिरकीपटूंमध्ये सर्वाधिक टी-२० बळींच्या यादीत आता अक्षर अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याच्या पाठोपाठ युझवेंद्र चहल याच्या ८० सामन्यांत ९६ बळी, तर कुलदीप यादव याच्या ५४ सामन्यांत ९५ बळी आहेत.

मात्र, फलंदाजीत अक्षरला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो केवळ २ धावा करून धावबाद झाला.

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या. अभिषेक शर्मा याने २४ चेंडूत ४३ धावा, ईशान किशन याने ४० चेंडूत ४९ धावा, तर कर्णधार श्रेयस अय्यर याने २२ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. अखेरीस तिलक वर्मा याने ११ चेंडूत नाबाद २४ धावा करत भारताला १९० धावांपर्यंत पोहोचवले.

१९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार फलंदाजी करत १९ षटकांत ६ गडी गमावून विजय मिळवला. जेकब बेथेल याने ४६ चेंडूत नाबाद ७६ धावा करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार होते. याशिवाय हॅरी ब्रूक याने १५ चेंडूत ३९ धावा, तर टॉम बँटन यानेही ३९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडने हा सामना ४ गडी राखून जिंकत मालिकेत महत्त्वाचा विजय नोंदवला.

Exit mobile version