स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये देशभक्ती आणि फिटनेसचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ‘हर घर तिरंगा सायकल यात्रा’ आयोजित करण्यात आली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या यात्रेत १ हजारांहून अधिक ‘माय भारत’ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
हातात तिरंगा आणि सायकलवर स्वार झालेले तरुण असा उत्साहपूर्ण माहोल यावेळी पाहायला मिळाला. या उपक्रमातून फिटनेससोबतच प्रदूषणमुक्त आणि निरोगी भारताचा संदेश देण्यात आला.
मनसुख मांडविया म्हणाले की, देश विकसित होण्यासाठी नागरिकांचे निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायकल चालवल्याने फिटनेस वाढतोच, शिवाय प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यास मदत होते. इंधनाची बचत होते आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांनीही तरुणांना फिट राहण्याचे आवाहन केले. तरुण निरोगी आणि तंदुरुस्त राहिले, तर देशही तंदुरुस्त राहील, असा संदेश त्यांनी दिला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता रामित टंडन यानेही या सायकल यात्रेत सहभाग घेतला. ‘फिट इंडिया’ अभियानाचा उल्लेख करत त्याने सायकलिंग हे आरोग्यासोबतच पर्यावरणासाठीही उत्तम साधन असल्याचे सांगितले.
दरम्यान, १५ ऑगस्ट जवळ आल्याने दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. उत्तम नगरसह राजधानीतील विविध भागांत पोलिसांकडून रात्रीची तपासणी वाढवण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. प्रमुख मार्गांवरही पोलिसांची करडी नजर आहे.
याशिवाय भारत मंडपम येथे ‘हर घर तिरंगा बाइक रॅली’चेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आधी दिल्लीमध्ये तिरंग्याचा उत्साह आणि देशभक्तीचा रंग अधिकच गडद होताना दिसत आहे.
