श्रीलंकेविरुद्ध गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ९ गडी गमावून ४६० धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे पूर्णपणे वाया गेले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने २१ षटके फलंदाजी केली. या सत्रात ७६ धावा करत ३ गडी गमावले. तिसऱ्या सत्रात भारताने २२ षटके खेळताना ९६ धावा केल्या आणि आणखी ४ गडी गमावले.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जायस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. जायस्वाल ३२ धावा करून बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलने डावाची धुरा सांभाळली. पडिक्कलने केएल राहुलसोबत दुसऱ्या गड्यासाठी १६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलसोबत पडिक्कलने ३९ धावा जोडल्या. या डावात गिल १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर पडिक्कलने ऋषभ पंतसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाला ३०० धावांच्या पुढे नेले.
हे ही वाचा:
किरण रिजिजूंनी सांगितली ‘दिमागी नक्षलीं’ची लक्षणे
कियाच्या दोन नव्या एसयूव्हीची एंट्री
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा कशी आणि कुठे पाहाल?
संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांची त्यावर श्रद्धा मात्र नाही
पंत ५ चौकारांच्या मदतीने ३९ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर पडिक्कलने ध्रुव जुरेलसोबत ३८ धावा जोडल्या. पडिक्कल आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावण्यापासून वंचित राहिला. त्याने २३० चेंडूंचा सामना करत १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १६७ धावांची शानदार खेळी केली.
यानंतर मानव सुथारने ध्रुव जुरेलसोबत ५५ धावांची भागीदारी केली. जुरेल ६८ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करून बाद झाला. तर सुथारने संघाच्या धावसंख्येत २४ धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव १२ धावांवर आणि प्रसिद्ध कृष्णा १ धावेवर नाबाद होते. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक ४ बळी घेतले आहेत. केशरा नुवानथाने ३ बळी मिळवले आहेत. याशिवाय असिथा फर्नांडोने १ बळी घेतला आहे.
