ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बांगलादेशने अखेर इतिहास रचला आहे. डार्विनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तब्बल ९ विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपला पहिलाच कसोटी विजय नोंदवला. तब्बल २३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने संपूर्ण सामन्यात यजमानांवर वर्चस्व गाजवत हा ऐतिहासिक विजय साकारला. या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे.
डार्विनच्या मारारा ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. हसन महमूदने भेदक गोलंदाजी करत ६ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा कणा मोडला. अनुभवी स्टीव्ह स्मिथने ७१ धावांची झुंज दिली, मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
यानंतर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात जबरदस्त प्रत्युत्तर दिले. तन्झीद हसनच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने ४२६ धावांचा मोठा डोंगर उभा केला. तन्झीदने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावणारा पहिला बांगलादेशी फलंदाज होण्याचा मान मिळवला. बांगलादेशने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर तब्बल २२८ धावांची आघाडी मिळवली आणि सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत केली.
हे ही वाचा:
विमल जाहिरातीवर एफडीएचा दणका; शाहरुख, अजय, टायगरला नोटीस
आपण भ्रष्टाचार केला नाही म्हणत तृणमूल नेत्याची आत्महत्या
बाहेर जेवताना भारतीयांची पसंती बदलली; हेल्दी फूडला वाढती पसंती
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. कॅमेरून ग्रीनने शानदार शतक झळकावत १०४ धावांची लढाऊ खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला डाव सावरण्याची संधी मिळाली. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८४ धावांवर संपुष्टात आला आणि बांगलादेशसमोर विजयासाठी केवळ ५७ धावांचे लक्ष्य उरले.
हे छोटे लक्ष्य बांगलादेशने कोणतीही अडचण न येऊ देता गाठले. १४.२ षटकांत केवळ एक विकेट गमावत बांगलादेशने ५७ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि ९ विकेट्स राखून ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. मुमिनुल हकने विजयी चौकार लगावत बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू केला.
या सामन्यात बांगलादेशच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो हसन महमूद. त्याने सामन्यात एकूण ९ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सातत्याने अडचणीत आणले. दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजनेही निर्णायक भूमिका बजावत ५ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत तन्झीद हसनचे शतक आणि गोलंदाजीत हसन महमूद व मेहदी हसन मिराज यांच्या प्रभावी कामगिरीमुळे बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर अक्षरशः निष्प्रभ ठरवले.
बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशचा हा केवळ दुसरा कसोटी विजय असला, तरी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. २००३ नंतर तब्बल २३ वर्षांनी ऑस्ट्रेलियात परतलेल्या बांगलादेशने यावेळी केवळ सामना खेळला नाही, तर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरातच पराभूत करून आपल्या कसोटी क्रिकेटमधील वाढत्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे.
या विजयाचा परिणाम जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेवरही झाला आहे. बांगलादेशचा विजयाचा टक्केवारी ५८.३३ वरून ६६.६७ टक्क्यांवर पोहोचला असून संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल स्थानावर असला, तरी बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची आघाडी कमी झाली आहे.
आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना २२ ऑगस्टपासून मॅके येथे होणार आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्का देत बांगलादेशने मालिका जिंकण्याची ऐतिहासिक संधी निर्माण केली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया जोरदार पुनरागमन करणार की बांगलादेश पुन्हा एकदा बाजी मारून मालिकेवर कब्जा करणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
