टीम इंडिया फायनलमध्ये!

आता न्यूझीलंडशी महासंग्राम

टीम इंडिया फायनलमध्ये!

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. आता ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताची भिडत न्यूझीलंडशी होणार आहे.

भारताने दिलेल्या २५४ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच डळमळीत झाली. फिल सॉल्ट केवळ ५ धावांवर हार्दिक पांड्याचा बळी ठरला. कर्णधार हॅरी ब्रूक ७ धावांवर बाद झाला. जोस बटलरने सुरुवात चांगली केली, पण १७ चेंडूत २५ धावा करून तोही वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. टॉम बॅन्टनने ५ चेंडूत १७ धावा केल्या, पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या ९५ धावांवर इंग्लंडचे ४ विकेट पडले होते.

यानंतर विल जॅक्स आणि जेकब बेथेल यांनी इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी मिळून ३९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. जॅक्सने २० चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर सॅम करन आणि बेथेल यांनी २७ चेंडूत ५० धावा जोडल्या. करनने १४ चेंडूत १८ धावा केल्या.

जेकब बेथेलने मात्र अप्रतिम खेळी करत ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने ४८ चेंडूत १०५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यात ८ चौकार आणि ७ षटकार होते. मात्र त्याची ही झुंज इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि इंग्लंडचा डाव ७ बाद २४६ धावा इथेच थांबला.

भारताकडून हार्दिक पांड्याने ३८ धावांत २ विकेट घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

याआधी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने टी-२० वर्ल्ड कपच्या नॉकआउटमध्ये इतिहास घडवला. टीम इंडियाने २० षटकांत ७ बाद २५३ धावा करत विक्रमी धावसंख्या उभी केली.

संजू सॅमसनने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत ४२ चेंडूत ८९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार होते. शिवम दुबेनेही २५ चेंडूत ४३ धावा करत संघाला भक्कम आधार दिला.

मात्र अभिषेक शर्मा ९ धावांवर बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादव ११ धावांवर माघारी परतला.

शेवटच्या षटकांमध्ये तिलक वर्माने ७ चेंडूत २१ धावा, तर हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ धावा करत भारताची धावसंख्या २५० च्या पुढे नेली.

इंग्लंडकडून विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी २-२ विकेट घेतल्या, तर जोफ्रा आर्चरने ४ षटकांत ६१ धावा देत महागडी गोलंदाजी केली.

आता संपूर्ण देशाचे लक्ष ८ मार्चला होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलवर लागले आहे.

टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे — विश्वविजेतेपदापासून!

Exit mobile version