भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध टी-२० वर्ल्डकपचा उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. या महत्त्वाच्या बाद फेरी लढतीपूर्वी ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतला.
या टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग तीन डावांत शून्यावर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावा केल्या. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची खेळी केली, तर वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावा केल्या. या सलामीवीराकडून उपांत्य फेरीत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, ईशान किशनने नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. सुपर-८ फेरीत झिम्बाब्वेविरुद्ध ३८ धावांची खेळी केली. निर्णायक सामन्यात त्याच्याकडून संघाला मोठ्या धावांची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
मुंबई शेअर बाजार १,५०० अंकांनी गडगडला
रॅपिडो चालकाच्या खात्यातून ५५० कोटींचे व्यवहार!
राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले! चार नावे जाहीर
‘तिने’ सुरू केली घरगुती मदतीसाठी कंपनी; ८०० कोटींची उलाढाल
अक्षर पटेलने या स्पर्धेत अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी दोन बळी घेतले. झिम्बाब्वेविरुद्ध एक गडी बाद केला. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही त्याच्याकडून महत्त्वाची कामगिरी अपेक्षित आहे.
टीम इंडियाने यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग चार गट सामने जिंकत सुपर-८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करल्यानंतर भारताने झिम्बाब्वेला ७२ धावांनी हरवले. त्यानंतर वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. इंग्लंडने नेपाळविरुद्ध ४ धावांनी विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करला. मात्र, स्कॉटलंड आणि इटलीला हरवत सुपर-८ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडने सेमीफायनल गाठले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत पाच सामने झाले असून भारताने त्यापैकी तीन जिंकले आहेत. विशेष म्हणजे, मागील दोन वर्ल्ड कपमध्ये भारत-इंग्लंड सेमीफायनलचा विजेता संघ अखेरीस विजेतेपद पटकावत आला आहे.
