सिराजची ‘षटकारांची हॅट्ट्रिक’; भारताचा विजयाचा सराव

श्रीलंकेवर सहा विकेट्सनी मात

सिराजची ‘षटकारांची हॅट्ट्रिक’;  भारताचा विजयाचा सराव

नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद सिराजने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत भारताला श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात सहा गडी राखून रोमांचक विजय मिळवून दिला.

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने पहिला डाव ८ बाद ३६३ धावांवर घोषित केला. निशान मदुष्काने रविंदू रसनथासोबत पहिल्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी केली. मदुष्का १२ चौकारांसह ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर रसनथाने पसिंदू सूर्यबंदरासोबत दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावा जोडल्या.

सूर्यबंदराने ७१ धावांचे योगदान दिले, तर कर्णधार सोनल दिनूषाने ५२ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गुरनूर बरारला एक बळी मिळाला.

प्रत्युत्तरात भारताने पहिला डाव ६ बाद ३५७ धावांवर घोषित केला. देवदत्त पडिक्कलने कर्णधार केएल राहुलसोबत दुसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली. पडिक्कल १८ चौकारांच्या मदतीने १४२ धावांवर नाबाद राहिला. केएल राहुलने ४० धावा केल्या, तर मानव सुथारने ४१ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून रमेश मेंडिस आणि असांका मनोज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने दुसरा डाव ६ बाद २०० धावांवर घोषित केला. संघाने ५१ धावांवर तीन गडी गमावले होते. त्यानंतर निशान मदुष्काने पवन रत्नायकेसोबत तिसऱ्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मदुष्का ६३ धावांवर निवृत्त दुखापतग्रस्त झाला, तर निपुण धनंजयने ४६ आणि अंजला बंडाराने ३५ धावा केल्या. भारताकडून गुरनूर बरार आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.

हे ही वाचा:

शांघायला ‘डॉल्फिन’चा तडाखा; १,३०० विमानं रद्द

नंबर वन सबालेन्काचा ‘गेम ओव्हर’!

शरीफ सरकार गुडघ्यावर…पीओके आंदोलक दहशतवादी नव्हेतर ‘देशभक्त’

लंकादहनासाठी टीम इंडिया सज्ज; विक्रमांसाठी हनुमानउडी!

भारतासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते. दुसऱ्या डावात भारताने आक्रमक सुरुवात केली. शुभमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत २०.१ षटकांत १०५ धावांची सलामी भागीदारी केली. गिल सात चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला, तर जैस्वालने ४६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्यानंतर निवृत्त दुखापतग्रस्त झाला.

भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नंतर धावांचा वेग काहीसा मंदावला. ऋषभ पंतने २८ धावा, तर रवींद्र जडेजाने २२ धावा करून निवृत्ती घेतली. त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र, नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद सिराजने सामन्याला नाट्यमय वळण दिले. भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. सिराजने केशरा नुवान्थाच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला.

Exit mobile version