जडेजा १५ धावा करताच गाठणार मोठा टप्पा

जडेजा १५ धावा करताच गाठणार मोठा टप्पा

आयपीएल २०२६ मधील तिसरा सामना सोमवारी गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष असणार आहे ते रवींद्र जडेजावर. कारण जडेजा फक्त १५ धावा करताच टी२० क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पार करणार आहे.

जडेजाने हा टप्पा गाठल्यास तो टी२० क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि २०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत हा विक्रम फक्त हार्दिक पांड्याच्या नावावर आहे. जडेजाने आतापर्यंत ३४६ टी२० सामन्यांत १३० च्या स्ट्राइक रेटने ३,९८५ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत २३५ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल २०२६ मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून ट्रेड होऊन तो राजस्थानच्या संघात दाखल झाला आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरीही तितकीच दमदार राहिली आहे. त्याने २५४ सामन्यांत १३० च्या स्ट्राइक रेटने ३,२६० धावा केल्या असून ५ अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने १७० विकेट्सही घेतल्या आहेत.

गोलंदाजीतही जडेजा एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नईविरुद्ध एक विकेट घेताच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत लसिथ मलिंगाला मागे टाकेल. मलिंगाच्या नावावर १७० विकेट्स आहेत.

गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये जडेजाने १४ सामन्यांत १३५ च्या स्ट्राइक रेटने ३०१ धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत ८.५६ इकॉनॉमीने १० विकेट्स घेतल्या होत्या.

राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची असते. आयपीएल इतिहासात या दोन्ही संघांनी ३१ सामने खेळले असून त्यापैकी १६ सामने चेन्नईने, तर १५ सामने राजस्थानने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना देखील तितकाच रोमांचक होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version