बुमराहला विकेट का मिळत नाहीत?

बुमराहला विकेट का मिळत नाहीत?

आयपीएल २०२६ हा हंगाम मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी अत्यंत निराशाजनक ठरत आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा बुमराह यंदा ना धावा रोखू शकतोय, ना विकेट मिळवू शकतोय.

मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमागे बुमराहचा फॉर्म हेही एक मोठं कारण मानलं जात आहे. सुरुवातीचे षटके असोत किंवा डेथ ओव्हर्स—बुमराह नेहमीच संघाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज राहिला आहे. मात्र, यंदाचा हंगाम त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळा ठरत आहे.

‘यॉर्कर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीवर यंदा सहज धावा होत आहेत. अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता.
बुमराहने आतापर्यंत ५ सामन्यांत १९ षटके टाकून १६४ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळालेली नाही.

इरफान पठाण काय म्हणाले?

इरफान पठाणने आपल्या यूट्यूब चॅनेलवर विश्लेषण करताना सांगितले,
“बुमराहच्या फॉर्ममध्ये मोठी समस्या नाही. पण तो सुमारे ४४% वेळा स्लो बॉल टाकतोय. जवळपास प्रत्येक दुसरा चेंडू धीमा असतो. जर त्याने जास्त वेगवान चेंडू टाकले, तर त्याला विकेट मिळू शकतात.”

आकाश चोप्रांचा वेगळा दृष्टिकोन

आकाश चोप्रा म्हणाले,
“यात बुमराहची चूक नाही. त्याची इकॉनॉमी अजूनही १० पेक्षा कमी आहे. पण इतर गोलंदाज खूप धावा देत असल्यामुळे फलंदाज बुमराहवर रिस्क घेत नाहीत. आणि टी२०मध्ये फलंदाज शॉट खेळायला गेला तरच विकेट मिळते.”

मुंबई इंडियन्ससाठी बुमराहचा फॉर्म परत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा, संघासाठी हा हंगाम आणखी कठीण होऊ शकतो.

Exit mobile version