अय्यर पुन्हा धुमाकूळ घालणार!

अय्यर पुन्हा धुमाकूळ घालणार!

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएल २०२५ मधील शानदार कामगिरी तो आयपीएल २०२६ मध्येही कायम ठेवेल, असा त्याचा विश्वास आहे.

श्रेयस अय्यरने मागील हंगामात १७ सामन्यांत १७५ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा करत दमदार कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

आयपीएल २०२६ साठी पंजाबने कूपर कोनोली आणि बेन ड्वारशुइस यांना संघात सामील केले आहे. पठाणच्या मते, अय्यरने आपली क्षमता सिद्ध केली असून या हंगामात तो आणखी प्रभावी कामगिरी करून भारतीय टी२० संघात पुनरागमन करू शकतो.

‘जिओस्टार’शी बोलताना पठाण म्हणाला, “श्रेयस आयपीएलला भारतीय टी२० संघात परतण्याची संधी म्हणून पाहतो का, हे मला ठाऊक नाही. पण त्याने पंजाबसाठी आणि भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वनडेमध्ये तो महत्त्वाचा खेळाडू आहे आणि टी२० संघातही त्याच्यासाठी जागा आहे.”

पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायरमधील अय्यरच्या खेळीचाही उल्लेख केला. “बुमराहविरुद्ध थर्ड मॅनकडे खेळलेला तो शॉट अजूनही आठवतो. तो पुन्हा अशीच कामगिरी करेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे तो म्हणाला.

पंजाबचा संघ संतुलित असल्याचेही पठाणने सांगितले. श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांच्यामुळे टॉप ऑर्डर मजबूत आहे. मधल्या फळीत नेहल वढेरा आणि शशांक सिंग तर फिनिशर म्हणून मार्कस स्टोइनिस संघात आहे.

त्याचबरोबर मिचेल ओवेनची कामगिरीही संघासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे पठाणने नमूद केले. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि मार्को जानसेन हे प्रमुख पर्याय असल्याचे त्याने सांगितले.

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सचा पहिला सामना ३१ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.

Exit mobile version