५१ वर्षांचा दुष्काळ संपवणार; मनप्रीतचा ‘मिशन वर्ल्ड कप’!

मनप्रीतचा ‘मिशन वर्ल्ड कप’

५१ वर्षांचा दुष्काळ संपवणार; मनप्रीतचा ‘मिशन वर्ल्ड कप’!

भारतीय हॉकी संघाचा अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंह याच्यासाठी एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ अत्यंत खास ठरणार आहे. हा आपल्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असू शकतो, अशी भावना व्यक्त करत मनप्रीतने यंदाच्या स्पर्धेत पदक जिंकून विश्वचषकाची ५१ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार केला आहे.

मनप्रीतसाठी हा चौथा विश्वचषक आहे. भारतीय संघाने गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये सलग पदके जिंकत मोठे यश मिळवले आहे. टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले. मात्र, विश्वचषकातील पदक अजूनही भारताच्या प्रतीक्षेत आहे. १९७५ मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता आणि त्यानंतर तब्बल ५१ वर्षे भारतीय हॉकीला विश्वचषक पदकाची प्रतीक्षा आहे.

मनप्रीत म्हणाला की, हा विश्वचषक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक ठरू शकतो, त्यामुळे आतापर्यंत जे साध्य झालेले नाही ते यावेळी मिळवण्याचा आपला ठाम निर्धार आहे. विश्वचषक जिंकून ही स्पर्धा संस्मरणीय करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

भारतीय संघाकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे उत्तम मिश्रण असून संघाची तयारीही चांगली झाली आहे, असा विश्वास मनप्रीतने व्यक्त केला. कर्णधार हरमनप्रीत सिंह, मनदीप सिंह आणि स्वतः मनप्रीत हे युवा खेळाडूंना अनुभवातून मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक सामना महत्त्वाचा असून प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचा आदर करत विजयाच्या मानसिकतेने मैदानात उतरावे लागेल, असे त्याने सांगितले.

यंदाच्या तयारीत फिटनेस आणि बचावफळीवर विशेष भर देण्यात आला आहे. मजबूत बचावामुळे आक्रमक खेळ करण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि सामन्यावर नियंत्रण ठेवता येते, असे मनप्रीतने स्पष्ट केले.

हरमनप्रीतवर मनप्रीतचा विश्वास

भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंह याचेही मनप्रीतने भरभरून कौतुक केले. हरमनप्रीत मैदानावर पुढाकार घेऊन नेतृत्व करतो, कठीण प्रसंगी खेळाडूंना प्रेरणा देतो आणि दबावाच्या परिस्थितीत संघाला शांत ठेवतो, असे त्याने सांगितले.

हरमनप्रीप्रीतची पासिंग रेंज, लाँग ओव्हरहेड्स आणि ग्राऊंड पासेस प्रभावी असून तो जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर्सपैकी एक आहे. त्याच्या ताकदवान आणि वैविध्यपूर्ण हिट्समुळे भारतीय संघाला मोठी ताकद मिळते. संघाला जेव्हा सर्वाधिक गरज असते, तेव्हा हरमनप्रीत पुढे येतो, असे मनप्रीतने म्हटले.

५१ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य!

१९७५ नंतर भारताला हॉकी विश्वचषकात पदक मिळालेले नाही. मात्र, सलग दोन ऑलिम्पिक पदकांनंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे विश्वचषक २०२६ मध्ये ५१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवून ऐतिहासिक कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.

मनप्रीतला विश्वास आहे—भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचेल आणि यावेळी इतिहास नक्की बदलेल!

Exit mobile version