पाकिस्तान सुपर लीग (PSL) या स्पर्धेवरही इस्रायल- अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाचे पडसाद उमटले आहेत. युद्धसदृश परिस्थितीमुळे ही स्पर्धा आता फक्त कराची आणि लाहोर या दोन शहरांपुरती मर्यादित करण्यात आली आहे. याशिवाय स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभही रद्द करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानमधील आर्थिक आणि संघर्ष तणावाची परिस्थिती उघडकीस आली आहे.
पीएसएल ही टी-२० लीग मुलतान, पेशावर, फैसलाबाद, कराची, रावळपिंडी आणि लाहोर या सहा शहरांमध्ये होणार होती. मात्र मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आणि प्रादेशिक सुरक्षेच्या चिंतेमुळे हा बदल करावा लागला. पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षा परिस्थिती, विशेषतः अफगाणिस्तान सीमेजवळ सुरू असलेलस संघर्ष, यामुळे हा निर्णय घेणे भाग पडले आहे.
पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी रविवारी (२२ मार्च) पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली आणि क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली. नकवी म्हणाले, “पीएसएल बाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. सध्याची परिस्थिती किती काळ राहील हे आम्हाला माहीत नाही, पण पीएसएल आयोजित करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे आणि त्यात परदेशी खेळाडू सहभागी आहेत. सर्वजण पीएसएलची आतुरतेने वाट पाहत आहेत.” नकवी यांनी सांगितले की खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत संघांच्या हालचाली मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फ्रँचायझी मालक आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला.
मोहसिन नकवी यांनी हेही स्पष्ट केले की स्पर्धा पुढे ढकलणे शक्य नव्हते. ते म्हणाले, “जर आम्ही पीएसएल पुढे ढकलली असती, तर नंतर ती आयोजित करण्याची संधी मिळाली नसती. आम्ही नवीन वेळापत्रक तयार केले आहे, ज्यामुळे संघांची हालचाल कमीत कमी राहील.”
हे ही वाचा:
… म्हणून इराणने क्षेपणास्त्रांवर लावला स्पॅनिश पंतप्रधानांचा फोटो
इराणी ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करणार!
२० लाख अमेरिकन डॉलर्स मोजा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज घेऊन जा!
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींची उच्चस्तरीय बैठक
प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारल्यामुळे तिकिटे खरेदी केलेल्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पीसीबीने सर्व तिकीटधारकांना पैसे परत देण्याचे आश्वासन दिले आहे. नकवी म्हणाले, “प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळतील आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पूर्णवेळ पीसीबी कर्मचारी पीएसएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, मात्र अर्धवेळ कर्मचारी संघांसोबत काम करतील. या निर्णयानंतर पीएसएलच्या आयोजनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. तरीही पाकिस्तान क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्याचा पीसीबीचा प्रयत्न आहे. आता मर्यादित साधनसामग्री आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही स्पर्धा कशी पार पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
