रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) लढतीआधी मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. सीम-बॉलिंग अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि डावखुरा सलामीवीर यशस्वी जायसवाल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ६ फेब्रुवारीपासून एमसीए-बीकेसी मैदानावर हा सामना रंगणार असून मुंबई-कर्नाटक असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
विजय हजारे स्पर्धेदरम्यान पिंडलीला दुखापत झाल्यानंतर शार्दुल काही काळ मैदानाबाहेर होता. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. या सामन्यात तो मुंबईचे नेतृत्व करणार असून संघाला अनुभवाची भक्कम साथ मिळणार आहे.
दुसरीकडे, यशस्वी जायसवालही प्रथमश्रेणी हंगाम पुन्हा सुरू झाल्यानंतर आपला पहिला रणजी सामना खेळणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने ६७ आणि १५६ धावांची खेळी करत आपली छाप सोडली होती. त्याच्या पुनरागमनाने मुंबईच्या फलंदाजीला धार येणार आहे.
४२ वेळा रणजी विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसमोर ८ वेळा विजेतेपद मिळवलेल्या कर्नाटकचे आव्हान आहे. देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल, के.एल. राहुल आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या दमदार खेळाडूंमुळे कर्नाटकही तितकाच मजबूत आहे.
दरम्यान, दिल्लीविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यात जवळ सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा फटका खेळाडूंना बसला होता. मास्क घालून खेळण्याची वेळ आली होती. मात्र क्वार्टर फायनलदरम्यान बांधकामस्थळी सुरक्षात्मक आच्छादनांचा वापर होणार असल्याने परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा आहे.
इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये जमशेदपूर येथे झारखंड-उत्तराखंड, इंदूर येथे मध्य प्रदेश-जम्मू काश्मीर आणि कल्याणी येथे बंगाल-आंध्र यांच्यात लढती होणार आहेत.
मुंबई संघ: शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जायसवाल, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, सरफराज खान, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), साईराज पाटील, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओंकार तर्मळे, दिव्येश सक्सेना, सूर्यांश शेडगे.
