रोहित-विराटच्या क्रेझसमोर जग नतमस्तक!

रोहित-विराटच्या क्रेझसमोर जग नतमस्तक!

भारतीय क्रिकेट संघाचा २०२६ मधील कार्यक्रम आधीच खूप व्यस्त आहे. मात्र बीसीसीआय हा कार्यक्रम आणखी गच्च करण्याचा विचार करत आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या वनडे सामन्यांची संख्या वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एका अहवालानुसार, इंग्लंड, न्यूझीलंड, आयर्लंड आणि श्रीलंका या क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयकडे आधी ठरलेल्या वनडे मालिकांमध्ये अधिक सामने जोडण्याची विनंती केली आहे. अतिरिक्त वनडे सामने झाल्यास या क्रिकेट बोर्डांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो.

या मागणीमागे मोठं कारण म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अफाट लोकप्रियता. हे दोन्ही भारतीय दिग्गज सध्या प्रामुख्याने वनडे फॉरमॅटमध्येच खेळताना दिसतात. त्यामुळे जास्तीत जास्त वनडे सामने झाले तर रोहित-विराटला अधिक वेळा मैदानात पाहण्याची संधी चाहत्यांना मिळेल.

या दोघांच्या नावावरच स्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढते. त्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड, आयर्लंड आणि श्रीलंका सारख्या बोर्डांना तिकीट विक्री आणि प्रसारणातून मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सध्या ३ वनडे आणि ५ टी-२० सामने नियोजित आहेत. मात्र या मालिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत कदाचित शेवटच्या वेळेस इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने आणखी २ वनडे सामने वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

ऑगस्ट महिन्यात भारत श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एक सामना सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये डे-नाईट कसोटी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डही बीसीसीआयशी चर्चा करून या दौऱ्यात व्हाईट-बॉल सामने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

बांगलादेश आणि यूएई येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेबाबत अनिश्चितता असल्याने त्या काळात भारत अतिरिक्त सामने खेळण्याचा पर्याय शोधू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेचे सामनेही अद्याप अंतिम झालेले नाहीत.

रोहित आणि विराट यांच्या लोकप्रियतेमुळे आगामी काळात भारताचे वनडे सामने वाढले तर आश्चर्य वाटायला नको!

Exit mobile version