वेन्यू बदलाच्या वादात आयसीसी थेट बांगलादेशात येणार

वेन्यू बदलाच्या वादात आयसीसी थेट बांगलादेशात येणार

टी-२० विश्वचषक २०२६ संदर्भात बांगलादेशच्या सामन्यांच्या मैदानावरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं शिष्टमंडळ थेट बांगलादेशात जाणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून हा टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे.

आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आयसीसीचे अधिकारी बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. आतापर्यंत दूरध्वनी, ई-मेल आणि ऑनलाइन चर्चांमधून हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ही प्रत्यक्ष बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सूत्रांनी सांगितले की,
“आयसीसीचे शिष्टमंडळ बांगलादेशात येऊन विश्वचषकाबाबत अखेरची प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”

बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि तेथील क्रीडा मंत्रालयाने भारतात कोणताही सामना खेळणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट मंडळाने कोलकाता संघाकडून बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळण्यास सांगितल्याचीही चर्चा आहे.

बांगलादेशमधील प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार, क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्पष्ट केलं आहे की,
“आयसीसीची एक टीम चर्चा करण्यासाठी बांगलादेशात येऊ शकते. मात्र आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. आम्हाला विश्वचषक खेळायचा आहे, विशेषतः श्रीलंकेत. हे आयोजन अशक्य नाही, असा आमचा ठाम विश्वास आहे.”

सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशला भारतात तीन सामने खेळायचे आहेत.
७ फेब्रुवारीला वेस्ट इंडीजविरुद्ध,
९ फेब्रुवारीला इटलीविरुद्ध,
आणि १४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध — हे सर्व सामने कोलकात्यात होणार आहेत.
त्यानंतर १७ फेब्रुवारीला मुंबईत नेपाळविरुद्ध सामना आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आहे की विश्वचषकातील त्यांचे सर्व सामने भारताबाहेर घ्यावेत. मात्र आयसीसीने स्पष्ट केलं आहे की स्पर्धेचं वेळापत्रक आधीच अंतिम झालेलं आहे. तरीही दोन्ही बाजूंमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती झाली आहे.

आता आयसीसीच्या या थेट चर्चेनंतर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version