उत्तर भारतापासून दक्षिण कोरियापर्यंत १० हजार किमीचा ढग??

उत्तर भारतापासून दक्षिण कोरियापर्यंत १० हजार किमीचा ढग??

उत्तर भारतापासून हिमालय, चीन आणि थेट दक्षिण कोरियापर्यंत पसरलेला तब्बल ७,००० ते १०,००० किलोमीटर लांबीचा ढगांचा भव्य पट्टा नव्या उपग्रह छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. यामुळे २०२६ च्या नैऋत्य मान्सूनच्या सर्वाधिक सक्रिय टप्प्यांपैकी एक अधोरेखित झाला आहे.

‘मान्सून कन्व्हर्जन्स झोन’ म्हणून ओळखला जाणारा हा विशाल ढगांचा पट्टा, हिंदी महासागरातून येणारे आर्द्रतेने परिपूर्ण वारे यामुळे हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेला ढगांचा आणि पावसाचा जवळपास अखंड मार्ग तयार झाला आहे. या विलक्षण हवामानस्थितीमुळे भारतभर मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.

पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार, मागील दोन दिवसांत देशात सरासरी दैनंदिन मान्सून पावसाच्या सुमारे १७० ते १८० टक्के पावसाची नोंद झाली असून, हा आतापर्यंतच्या हंगामातील सर्वाधिक पावसाचा कालावधी ठरला आहे. हवामान तज्ज्ञांनी या घटनेचे वर्णन “प्रचंड मान्सून दिवस” असे केले असून, अनेक भागांत पर्जन्यमान हे हवामानशास्त्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे सांगितले.

उपग्रह छायाचित्रांमध्ये मध्य, उत्तर आणि पूर्व भारताचा मोठा भाग दाट ढगांनी व्यापलेला दिसतो. त्यानंतर हा ढगांचा पट्टा हिमालयीन प्रदेशातून ईशान्येकडे चीन आणि जपानपर्यंत विस्तारलेला दिसतो. अशा प्रकारचे लांबट ढगांचे पट्टे तेव्हा तयार होतात, जेव्हा मान्सून खूूप सक्रिय असतो आणि वातावरणातील अभिसरण उष्ण, आर्द्रतेने समृद्ध हवा मोठ्या प्रमाणात वरच्या दिशेने खेचते.

ही आर्द्र हवा वर गेल्यानंतर थंड होते आणि तिचे संघनन होऊन प्रचंड उंचीचे पावसाचे ढग तयार होतात. त्यामुळे आशियातील विस्तीर्ण भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळतात. पावसातील ही वाढ गेल्या काही आठवड्यांपासून असमान राहिलेल्या मान्सूननंतर दिलासादायक ठरली आहे. त्या काळात अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तुटीची परिस्थिती निर्माण झाली होती.

हे ही वाचा:

पश्चिम आशियातील युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर घाला

संसदेच्या दारात खडाजंगी! दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

बर्गर-कचोरीवरून दीपके-विजेता दहियामध्ये बिनसले!

लवलीनाने उंचावली भारताची शान!

सध्याच्या पावसाच्या या जोरदार टप्प्यामुळे विशेषतः उत्तर आणि मध्य भारतातील हंगामी पर्जन्यमानाच्या आकडेवारीत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

या सक्रिय मान्सूनमुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानच्या काही भागांत आधीच मुसळधार पाऊस झाला आहे. तर बंगालच्या उपसागरातून भूभागाकडे सरकणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांच्या प्रभावामुळे पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अतिवृष्टी सुरूच आहे.

मात्र, या तीव्र मान्सूनमुळे चिंता देखील वाढली आहे. पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने विशेषतः उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या हिमालयीन राज्यांमध्ये अचानक पूर, पाणी साचणे, भूस्खलन आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा इशारा दिला आहे.

हा विलक्षण ढगांचा पट्टा आशियातील हवामान प्रणाली किती परस्परांशी जोडलेल्या आहेत, हे देखील अधोरेखित करतो.

भारतीय नैऋत्य मान्सूनाकडे अनेकदा केवळ प्रादेशिक हवामान घटना म्हणून पाहिले जाते. मात्र, या उपग्रह छायाचित्रांमुळे तो प्रत्यक्षात अरबी समुद्रापासून पश्चिम प्रशांत महासागरापर्यंत संपूर्ण खंडातील हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या व्यापक वातावरणीय अभिसरणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान तज्ज्ञांच्या मते सध्याचा पावसाचा टप्पा भारतातील हंगामी पावसाची तूट मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. तसेच जलाशयांतील पाणीसाठा वाढवण्यास आणि सुरू असलेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version