पालघरमध्ये पावसाचा कहर! सूर्या-वैतरणा धोक्याच्या पातळीवर

डहाणू, बोईसर, वांगाव, चिंचणीसह अनेक भाग जलमय

पालघरमध्ये पावसाचा कहर! सूर्या-वैतरणा धोक्याच्या पातळीवर

पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः ठप्प केले आहे. सततच्या पावसामुळे सूर्या आणि वैतरणा या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. डहाणू, बोईसर, वांगाव, चिंचणी, तलासरी, पालघर, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसामुळे सूर्या आणि वैतरणा नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेले आहे. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. डहाणू तालुक्यातील उर्से-साये येथील कॉलनी पाडा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. अनेक गावांतील रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ

भारताची अनाहत पुन्हा चमकली!

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही!

आईसाठीच होतं ते सेलिब्रेशन!

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका वीज वितरण व्यवस्थेलाही बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या कोसळल्याने शेकडो गावांमधील वीजपुरवठा ४८ तासांहून अधिक काळ खंडित आहे. पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या भागातील लाखो नागरिक अंधारात असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकतीच लावणी केलेली भाताची रोपे अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी ती वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. शेकडो हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.

दरम्यान, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी नालासोपारा पूर्वेतील गाला नगर भागात तिसऱ्या दिवशीही पाणी साचून आहे. अनेक दुकाने, भाजी मार्केट आणि रस्ते अद्याप जलमय असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने परिस्थितीवर लक्ष ठेवत वाहतूक शक्य तितकी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

Exit mobile version